। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या टिका करीत त्यांनी आत्मपरिक्षण करावे असा सल्ला दिल्याने संतप्त झालेल्या खा. सुनील तटकरे यांनी आ. दळवींना आवास येथील कार्यक्रमात समोरासमोर चांगलीच तंबी दिली. तुम्हाला नेमके कोठे काय बोलायचे आगीत तेल कसे ओतायचे याची उत्तम माहिती आहे. सरपंचापासून आमदारकीपर्यंत पोहचताना किती पक्षांच्या मांडवाखाली किती नेत्यांच्या सोबत तुम्ही वावरला आहात. ज्याच्याकडून जे-जे पाहिजे ते ते नेमके घेतले. जे सोडायचे ते सोडलेत देखील आणि आपले स्थान कसे मिळवायचे तेही स्थान मिळविता येईल याचेही प्रयत्न केलेत. पण हे पुढे जर टिकवायचे असेल तर काही गोष्टींपासून अलिप्त रहावे. हे शिकलात तर ठिक नाही शिकलात तर पुढे जे होईल त्याला सामोरे जावे असा गर्भित ताकीदही तटकरे यांनी त्यांना दिली.
आवास येथील क्षात्रेक्य समाजाच्या कृषक महोत्सवाच्या समारोपावेळी ते बोलत होते. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांना चांगलाच टोला दिला. सुनील तटकरे म्हणाले, बैलगाडी शर्यत म्हणले अलिबागमधील वैशिष्टये आहे. मला एवढे दिवस वाटत होते की महेंद्र दळवींना बैलगाडीचाच नाद आहे. पण दोन तीन दिवसांच्या वक्तव्यातून मला कळाले की, ते इतिहासाचे देखील गाढे अभ्यासक आहेत. इतका इतिहासाचा गाढा अभ्यासक मी कधी पाहिला नव्हता. परवाच्या दिविशी महेंद्र दळवींच्या रुपाने पाहिला तो थोर विचारवंत आणि जागतिक किर्तीचे विचारवंत. तेंव्हा त्यांनाही थेट अजितदादांना सल्ला द्यावासा वाटला की त्यांनी आत्मपरिक्षण करावे पण अजितदादांनी आत्मपरिक्षण कशासाठी करायचे हे त्यांनी मात्र सांगितले नाही. ते सांगायला गेले असते तर अजून प्रकरण अंगाशी आले असते. पण तेवढया पुरते त्यांनी स्तीमीत ठेवले आणि ते थांबले. इतिहास आकलन करण्याचा तुम्ही प्रयत्न करता ही आमच्या दृष्टीकोनातून स्तुत्य बाब आहे. लोकप्रतिनिधी इतिहासाकडे वळू पाहतोय ही स्तुत्य बाब आहे. पण वळताना चुक होणार नाही याची काळजी घ्या.