| पनवेल | वार्ताहर |
सिडकोने 2003 पासून कामोठे नोड विकसित करण्यास सुरुवात केली. आजमितीला कामोठे शहरातील लोकसंख्या 2-3 लाख झाली आहे. शहरात अनेक समस्या आहेत. त्यात पार्किंगची समस्या भयानक आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत असून ती तातडीने दूर करावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबात दुचाकी-चार चाकी गाडीचा वापर वाढला आहे. सद्य परिस्थितीत कामोठेमध्ये बहुसंख्य घरात गाड्या आल्या मात्र गाडी पार्क कुठे करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात वाहतूक पोलिस कार्यवाही करत आहेत. खांदेश्वर आणि मानसरोवर स्टेशनवर खांदा कॉलनी तसेच कळंबोलीमधील प्रवासी स्टेशन परिसरात वाहने पार्किंग करून पुढे कामावर जात आहेत. मात्र दोन्ही स्टेशन परिसरात पार्किंगसाठी जागा अपुरी असल्याने रस्त्याच्या दुतर्फा गाड्या उभ्या केल्या जातात. त्यामुळे गर्दीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. नागरिकांना चालणे देखील मुश्किल झाले आहे. गेल्या पाच वर्षात परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे, पण त्याचवेळी पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने सोयीनुसार या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांचा होणार त्रास कमी व्हावा यासाठी कामोठेत बहुमजली वाहनतळ उभे करावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने कार्याध्यक्ष गौरव पोरवाल, अल्पेश माने, नितीन पगारे, शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांनी पनवेल महानगर पालिकेकडे तसेच वाहतूक शाखेकडे केली आहे.