मच्छिमारांच्या समस्या सोडवा: आ.रमेश पाटील

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
कोकण किनारपट्टीवरील सागरी जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांच्या समस्यांबाबत मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नुकतीच एक विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये आमदार व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश पाटील यांनी मच्छीमार बांधवांच्या अनेक समस्यांवर मत्स्यव्यवसाय मंत्री यांचे विशेष लक्ष वेधले आहे.सदरील सभेत आमदार पाटील यांनी मुंबईतील सर्व कोळीवाड्यांचे सीमांकन पूर्ण करावे व नवीन डी.सी.आर. तयार करून त्याचा 2034 च्या विकास आराखड्यामध्ये समावेश करण्यात यावा. तसेच सागरी जिल्ह्यातील कोळीवाड्यांचे देखील सीमांकन लवकरात लवकर करावे.

कोकण किनारपट्टीवर वारंवार नैसर्गिक आपत्ती येत असल्यामुळे मच्छीमार बांधवांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत असून त्यांना तुटपुंजी आर्थिक मदत मिळत असल्याने एन.डी.आर.एफ. चे निकष बदलण्यात यावे, नैसर्गिक आपत्तीमध्ये सागरी किनारी असणार्‍या मच्छीमार बांधवांच्या घरांचे संरक्षण करण्याकरिता धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्यात यावे व शेतकर्‍यांची 1 रुपयांमध्ये विमा पॉलिसी उतरवली जाते त्याचधर्तीवर नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान व अपघात झालेल्या मच्छीमार बांधवांना मदत मिळण्याकरिता मच्छीमार बांधवांची देखील 1 रुपयांमध्ये विमा पॉलिसी काढण्यात यावी. तसेच राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेअंतर्गत मच्छीमार बांधवांचे थकीत असलेले 588 कोटी रुपये कर्ज माफ करून मच्छीमार बांधवांचा उर्वरित डिझेल परतावा देण्यात यावा या आग्रही मागण्या करीत. त्याचप्रमाणे किनारपट्टीवरील 173 बंदरातील गाळ काढावा अशा मागण्या मंत्री महोदयांकडे करून शासनाने मच्छीमार बांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी पाटील यांनी मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.

,मत्स्यव्यवसाय मंत्री यांनी एनडीआरएफचे निकष बदलण्याकरिता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे सांगून सागरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी असलेल्या मच्छीमार बांधवांच्या घरांचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्याकरीता सर्व सागरी जिल्ह्यात पी.डब्ल्यू.डी. विभागामार्फत धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्यात येतील असे अभिवचन यावेळी त्यांना देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मच्छीमार बांधवांच्या समस्यांबाबत सरकार अनुकूल असून पुढील काळात या समस्यांची सोडवणूक करून मच्छीमार बांधवांना सरकार नक्की दिलासा देईल असे मंत्री महोदयांनी आश्‍वासन पाटील याना दिले आहे.

Exit mobile version