यंदा लवकरच वरुणराजाचं कोकण-मुंबईत आगमन

। मुंबई । वार्ताहर ।
मागील काही दिवसांपासून उन्हाच्या झळा जास्त प्रमाणात जाणवत आहेत. आणि या झळ्याने घामाच्या धारांनी हैराण झालेल्या नागरिकांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण, यंदा मान्सून देशात १० दिवस अगोदरच दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर पॉडकास्ट संस्थेकडून हा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात झालेल्या वातावरणातील बदलाने मान्सून भारतात लवकर दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे लवकरच उष्णतेच्या तडाख्यातून नागरिकांची सुटका होणार आहे. युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर’च्या अंदाजानुसार साधारण २० ते २१ मे या दिवशी मान्सून अंदमानात दाखल होणार आहे. यानंतर २८ ते ३० मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे.
मागीलवर्षी केरळमध्ये १ जून दिवशी मान्सूनचे आगमन होणार, असे सांगण्यात आले होते. मात्र, चक्रीवादळाने केरळमधील मान्सूनचे आगमन ३ जूनपर्यंत लांबणीवर पडले होते. यामुळे आतादेखील सर्व परिस्थिती सुरळीत राहिल्यास मान्सून २८ मे पर्यंत केरळमध्ये दाखल होणार आहे. यानंतर मान्सून भारताच्या इतर भागांच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात करणार आहे. राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून तापमानाने चांगलेच उच्चांक गाठले आहे. महाराष्ट्रात काही भागांमध्ये गेल्या १२२ वर्षांती उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.
यामुळे मान्सूनचे लवकर आगमन होणे, हा मोठा दिलासा ठरणार आहे. मान्सूनचा पाऊस तळकोकणात कधी दाखल होणार, याचा अंदाज अद्याप हवामान विभागाने जाहीर केला नाही. मात्र, मान्सूनचा आजवरचा साधारण प्रवास लक्षात घेता केरळमध्ये आगमन झाल्यावर मान्सून ७ जूनपर्यंत तळकोकणात दाखल होऊ शकणार आहे. यानंतर ४ दिवसांत म्हणजे ११ जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होऊ शकणार आहे.

Exit mobile version