खेळांमुळे निर्माण होणारी खेळाडूवृत्ती महत्वाची

महावितरणचे संचालक अरविंद भादिकर यांचे प्रतिपादन

। पुणे । प्रतिनिधी ।

खेळांमुळे खेळाडूवृत्ती व संघभावना निर्माण होते व हेच गुण महत्त्वाचे आहेत. त्यामुळे कोणत्याही पराभवाला सामोरे जाऊन, त्यावर मात करून नवीन भरारी घेण्याची वैयक्तिक व सांघिक जिद्द निर्माण होते, असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (संचालन)अरविंद भादिकर यांनी बुधवारी (दि.29) केले.

बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या 45 व्या राष्ट्रीय कबड्डी, कुस्ती व टेबल टेनिस क्रीडास्पर्धेला प्रारंभ झाला. संचालक अरविंद भादिकर यांच्याहस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर महापारेषणचे संचालक (प्रकल्प)अविनाश निंबाळकर, महानिर्मितीचे संचालक (मायनिंग) डॉ. धनंजय सावळकर, पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, आयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता राजेंद्र पवार, मुख्य अभियंता अनिल कोलप (महापारेषण), मुख्य अभियंता सुनील पावडे (महावितरण) व अधीक्षक अभियंता संजय भागवत (महानिर्मिती), मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके (महावितरण) व पुरुषोत्तम वारजुरकर (महानिर्मिती), अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाचे अध्यक्ष जिग्नेश रे, सरचिटणीस नरेश कुमार, उपाध्यक्ष भारत पाटील, खजीनदार ललित गायकवाड यांची उपस्थिती होती.

या राष्ट्रीय स्पर्धेत गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड, पंजाब, राजस्थान, दिल्ली, हिमाचल प्रदेशातील तसेच इतर खासगी अशा 14 वीज कंपन्यांचे 30 संघ व सुमारे 375 खेळाडू सहभागी झाले आहेत. शुक्रवारी (दि. 31) या स्पर्धेचा समारोप होणार आहे. उदघाटन कार्यक्रमात सर्व खेळाडूंनी संचलन करीत पाहुण्यांना मानवंदना दिली. तसेच रवींद्र जगदाळे व सहकार्‍यांनी शिवकालिन मैदानी खेळ सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंताराजेंद्र पवार यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्य अभियंता अनिल कोलप तर सूत्रसंचालन संतोष पाटणी व रामगोपाल अहीर यांनी केले. संजय भागवत यांनी आभार मानले.

Exit mobile version