राज्यातील 30 जिल्ह्यांतील हजारो शेतकर्यांकडून अवलंब
। नेरळ । संतोष पेरणे ।
सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्र तेथील प्रयोगशील शेतीसाठी प्रसिद्ध आहे. शेतकरी वर्गासाठी येथे विविध तंत्रज्ञान विकसित केले जात असते. कृषीभूषण, कृषीरत्न शेतकरी शेखर भडसावळे यांनी विकसित केलेले एसआरटी तंत्रज्ञान देशातील शेतकरी वर्गासाठी आदर्शवत ठरत आहे. दरम्यान, नांगरणी आणि कोळपणी न करता शेती आणि तीदेखील एका वर्षात किमान तीन पिके एसआरटी पद्धतीचा शेतीत अवलंब केल्यास घेता येत असल्याने अनेक राज्यांतील शेतकरी आकर्षित झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांतील हजारो शेतकरी शून्य मशागतवर आधारित सगुणा राईस टेक्निक म्हणजे एसआरटीचा अवलंब शेतीमध्ये विविध प्रयोग करण्यासाठी करीत असतात. शेखर भडसावळे आणि त्यांच्या टीमने 2011 मध्ये सगुणाबाग राईस टेक्निक शोधून काढली.
त्याआधी अनेक वर्षे शेखर आणि त्यांचे सहकारी भाताच्या नवीन जाती विकसित करण्यात आघाडीवर आहेत. जास्त उत्पादन देणार्या भाताच्या अनेक जाती सगुणा बागेने विकसित केल्या आहेत. त्या प्रत्येक वेळी शेतात वर्षातून दोनदा पिके घेण्यासाठी ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करायचे. त्याचवेळी मजूर शोधून लावणी तसेच मशागत करावी लागत असल्याने शेखर आणि त्यांच्या सहकारी यांनी नवीन काही तर उपाय शोधले पाहिजेत, याची वारंवार चर्चा केली. त्यातून एसआरटी जन्माला आली.
एसआरटी म्हणजे काय?
सगुणाबाग राईस टेक्निक (एसआरटी) म्हणजे नांगरणी न करता शेतात पिके घेण्याची पद्धत. सगुणा रुरल फाऊंडेशनच्या माध्यमातून एक लोखंडी अवजार विकसित करण्यात आले, त्याच्या सहाय्याने एकदा वाफे पाडल्यानंतर पुन्हा चार-पाच वर्षे कोणतेही नवीन वाफे पाडण्याची गरज लागणार नव्हती. त्याचवेळी वेळेवर कीटकनाशक यांची फवारणी, पाण्याचे नियोजन केल्यास वर्षातून किमान तीन पिके घेता येणे या पद्धतीत सहज शक्य होते. त्याचवेळी प्रामुख्याने कमी पावसाच्या भागातदेखील ही एसआरटी पद्धत फायदेशीर ठरली आहे.
प्रचार आणि प्रसार…
एसआरटी तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी आता तेथे राज्याबाहेरील शेतकरी येत आहेत. सध्या तेथील एसआरटीवर केलेले भाताचे पीक, तसेच मूग, भुईमुग, ऊस, भाजीपाला, मका यांच्या शेतीची पाहणी करण्याकरिता आणि या नविन तंत्रद्यानाचा अभ्यास करण्यासाठी ते शेतकरी येत आहेत. आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक राज्यांतील शेतकरी त्यांच्या राज्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी पर्यटन केंद्र असलेल्या सगुणाबागेत येत आहेत.त्यांना स्वतः शेखर भडसावळे, तसेच तेथील एसआरटीवर काम करणारे अनेक अॅग्रीकल्चर पदवीधर आणि एसआरटी पद्धतीने शेती करणारे शेतकरी हे स्वतः एसआरटीबद्दल जनजागृती करण्याचे काम करीत आहेत.