आझाद हिंद शेतकरी संघटनेने दर्शविला पाठिंबा
। पोलादपूर । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे खासगीकरण रद्द करून सरकारी विलीनीकरण करण्यासाठी आझाद हिंद शेतकरी संघटनेने पाठिंबा दर्शविला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांना एस.टी.च्या विलिनीकरणाला पाठिंब्याचे पत्र महाड तहसिलदार सुरेश काशिद यांच्यामार्फत पाठविण्यात आले आहे.
तसेच, महाड एस.टी.आगारातील आंदोलनकर्त्या एस.टी.कर्मचार्यांना आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी भेटून पाठिंबा दर्शविला आहे. दिवाळी सणाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या कर्मचार्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन स्वीकारले असून, यापैकी एक प्रमुख मागणी वगळता सर्व मागण्या शासनातर्फे स्वीकारण्यात आल्या आहेत. मात्र, राज्यशासनात विलनीकरण ही प्रमुख मागणी पूर्ण न झाल्याने कर्मचारी आंदोलन करीत आहेत.
आझाद हिंद शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ऍड.सतीशचंद्र रोठे पाटील व कोकण प्रदेश अध्यक्ष काळूराम आर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला अध्यक्षा अस्मिता भूषण देवळेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर झांजे, महाड पोलादपूर तालुका अध्यक्ष संजय आंबावले, महाड तालुका अध्यक्ष बापू डोंबे, महाड तालुका कामगार अध्यक्ष संतोष चव्हाण, महाड तालुका उपाध्यक्ष विजय चाळके, उज्ज्वला गायकवाड, हरिश्चंद्र उंदरे, बाळकृष्ण वाडकर, रामचंद्र मोरे, संदीप कदम, बबन बटावले, विद्याधर हेले, एकनाथ सुतार, दत्ताराम मोरे आदींनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे खासगीकरण रद्द करून सरकारी विलीनीकरण करण्यासंदर्भातील आंदोलनाला पाठिंबा असल्याचे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांना महाड तहसिलदार सुरेश काशिद यांच्यामार्फत पाठविण्यासाठी दिले.
यानंतर महाड येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगारामध्ये सुरू असलेल्या आंदोलनस्थळी जाऊन आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकार्यांनी आंदोलनाला आझाद हिंद शेतकरी संघटनेचा पाठिंबा असल्याचे निवेदन देऊन पाठिंबा दर्शविला.