ठाणेकरांची तहान भागणार
। ठाणे । प्रतिनिधी ।
ठाणे, भिवंडी-निजामपूर आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणार्या स्टेम प्रकल्पात 500 दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन पंप हाऊस आणि 12 किलोमीटरची नवीन जलवाहिनी यांच्या कामाचा शुभारंभ महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला आहे.
मूलभूत सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी विशेष तरतुदी अंतर्गत महापालिकांना राज्य शासनाकडून अनुदान मिळते. त्या अंतर्गत, ठाणे, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणार्या स्टेम प्रकल्पाची पाणी उचल क्षमता वाढवण्यासाठी, नवीन पंप हाऊसचे बांधकाम, नवीन जलवाहिनी टाकणे आणि जुन्या जलवाहिनीची दुरुस्ती करणे या कामासाठी 278 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निधीला ऑक्टोबरमध्ये मान्यता दिली होती. तांत्रिक मान्यता होऊन सुमारे तीन वर्षे प्रलंबित राहिलेल्या या प्रकल्पासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाठपुरावा केला होता.
स्टेम अंतर्गत येणार्या महापालिका क्षेत्राची वाढीव पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन नवीन पंप हाऊस आणि नवीन जलवाहिनी यांचे काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा अवधी देण्यात आला असला तरी ते काम दीड वर्षातच पूर्ण करावे. त्यामुळे या परिसराला कोणत्याही अडथळ्याशिवाय पाणीपुरवठा करणे शक्य होईल. तसेच, भविष्यात वाढीव पाणी उपलब्ध झाल्यास तेही या यंत्रणेमार्फत पुरवणे शक्य होईल, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. या शुभारंभ प्रसंगी, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, स्टेमचे व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत आदी मान्यवर उपस्थित होते.
नवीन पंप हाऊसमुळे पाणी उचलण्याची क्षमता तर वाढेलच. शिवाय नवीन जलवाहिनी अंथरल्यामुळे पाण्याची गळती तसेच घट कमी होईल. तसेच, सध्या नऊ पंप चालवून पाणी उचलावे लागते. नवीन व्यवस्थेत सहा पंप चालवावे लागतील. त्यामुळे विजेची मोठ्या प्रमाणात बचत होईल.
संकेत घरत,
व्यवस्थापकीय संचालक