समुद्रातील वादळाचा मासेमारीला फटका; बोटील किनार्यावर, बाजारातही मंदीची लाट
| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
गेली काही महिने समुद्रकिनारी वादळी वारे, जोराचा पाऊस, मोठी भरती अशा संकटांतून कोळी बांधव सातत्याने जात आहे. दर्यातील तुफानाचा मासेमारीला फटका बसला असून, मागील दोन दिवसांपासून बोटी किनार्यावर नांगरण्यात आल्या आहेत. मासेमारीचा चांगला हंगाम फुकट जात असल्याने मच्छिमार्यांसमोरील आर्थिक अडचणीत वाढत होत आहे. जंजिरा किल्ला नुकताच पर्यटनासाठी सुरु करण्यात आला आहे, परंतु पावसामुळे पर्यकांची संख्या कमी झाली आहे.
सातत्याने होणार्या हवामानबदलाचा फटका बाजारपेठेला बसत असून, मंदीची लाट दिसून येत आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या पावसाच्या अंदाजामुळे पर्यटकांनीही पर्यटनस्थळांकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. परिणामी, स्थानिक बाजारपेठांमधील व्यवहार मंदावले आहेत.
आधीच पितृपक्ष सुरु असल्याने कोणतीही नवीन कामे होत नाहीत व त्यात वादळी हवामान जाहीर झाल्याने पर्यटक कोकणात जाणे टाळतात. आता कुठे सर्व सुरळीत होत असताना पुन्हा एकदा हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला असून, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांची संख्या मंदावली असून, हॉटेल व्यावसायावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. आधीच पावसाळ्यात तीन महिने बसून असल्याने या हंगाम खराब हवामानामुळे परत बसून राहावे लागणार का, या चिंतेने त्यांना भेडसावले आहे.