जिल्हाधिकारी किशन जावळे
| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या परिसरात निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिले. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. रायगड मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात शनिवारपासून लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी शासकीय, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले भित्तीपत्रक, झेंडे, कटआऊट्स, संदेश काढून त्याचा अहवाल 24 तासात सादर करावा. भिंतीवरील रंगविलेल्या जाहिरातीदेखील काढण्यात याव्यात, असे निर्देश जावळे यांनी दिले. ‘सी- व्हिजील’ ॲपवर आलेल्या तक्रारींसंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
मतदान केंद्रांवरील सुविधा विशेषत: पाणी, वीज, स्वच्छतागृहे, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प याचेही आतापासून नियोजन करा. सर्व संबंधित यंत्रणांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी करावी. तसेच आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा तयार करून घ्याव्यात. तसेच भरारी पथक सक्रीय ठेवा. आचारसंहिता काळात नवीन विकासकामांना परवानगी देता येणार नाही. तसेच नवीन कामांना सुरुवात करता येणार नाही. सद्यःस्थितीत सुरु असलेली कामे नियमितपणे सुरु ठेवायची आहेत, असेही जावळे यांनी स्पष्ट केले.
मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रत्येकांनी ‘स्वीप’चे आतापासूनच नियोजन करावे. त्यादृष्टीने काही वेगळे अनोखे उपक्रम राबवावेत. सर्व समाज घटकांचा यामध्ये सहभाग घ्यावा. त्यांच्यामध्ये जनजागृती करावी, असेही निर्देश जावळे यांनी यावेळी दिले. निश्चित केलेली सभा ठिकाणी सर्व राजकीय पक्षांना सभा घेण्याची समान संधी देण्याबाबत संबंधित यंत्रणेमार्फत कार्यवाही करण्यात यावी. शासकीय विश्रामगृह यांचा वापर राजकीय कारणासाठी अथवा प्रचार, सभा, मेळावे यासाठी होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.
शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी असलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे. कुणीही राजकीय प्रचारात सहभागी होऊ नये, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. निवडणूक ही सामूहिक जबाबदारी आहे. सर्वांनी आपल्या कर्तव्याचे आणि जबाबदारीचे पालन करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच सर्व नोडल अधिकारी आणि विभाग प्रमुख उपस्थित होते.
