| सुधागड -पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यात मागील दोन-तीन दिवसापासून वातावरण आणि बरसलेल्या अवेळी पावसामुळे आंबा पिकाला चांगलाच फटका बसला आहे. यामुळे आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुधागड तालुक्यात मोहरानी बहरलेले व काही ठिकाणी कैर्या धरलेले आंबा पीक अवकाळीने पूर्णता धोक्यात आले आहे. यावर्षी आंब्यांना चांगला मोहर आला होता. अवेळी पाऊस यामुळे आंबा बागायतदारांचे फार प्रमाणावर नुकसान झाले असून, या पावसाचा परिणाम आंबा पीकावर झाला आहे. रत्नागिरी आणि देवगड हापूसची जातीच्या आंब्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आंबा पिकांवर अवेळी पाऊस, तापमानात वाढ आणि कमीपणा आदीबाबत शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान झाले असून तालुक्यातील झालेल्या नुकसानीची पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आंबा बागायतदारांनी केली आहे.
या वर्षी आंबा पीक चांगले येईल अशी परिसरातील सर्वच बागायतदार शेतकर्यांची अपेक्षा होती. परंतु नैसर्गिक बदलामुळे आता अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बागायतदारांना बदलत्या हवामानाचा व अवेळी पावसाचा चांगलाच बसल्यामुळे शेतकरी आर्थिकसंकटात सापडलेला आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी.
संजय घोसाळकर आंबा बागायतदार
सहा गावांचा अहवाल आला आहे. बारा बागायतदारांचे अंदाजे सहा हेक्टर आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाची माहिती शेतकरी व बागायतदारांना देतो आहे. ज्यांचे कोणाचे नुकसान झाले आहे त्यांनी कृषी विभागाकडे संपर्क साधावा.
जे. बी. झगडे, तालुका कृषी अधिकारी सुधागड