मतदारसंघात पसरला नाराजीचा सूर
| महाड | उदय सावंत |
रायगड लोकसभा मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत निवडून आलेले राष्ट्रवादीचे खासदार व विद्यमान अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष यांना दिलेल्या वचनांचा विसर पडला आहे. पुन्हा नवी आश्वासने घेऊन ते आगामी निवडणुकीत उभे राहिले आहेत. त्यामुळे मागील निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी उपस्थित केला आहे.
रायगड लोकसभा2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी एक संकल्पपत्र प्रसिद्ध केले होते. या संकल्पपत्रातून देण्यात आलेली वचने किती पूर्ण झाली, हा एक प्रश्नच आहे. खासदार सुनील तटकरे यांनी मुंबईलगत असणाऱ्या रायगडमध्ये विकासाच्या अगणित संधी आहेत. मुंबईसाठीचे सेवा पुरवठा केंद्र, पर्यटनासाठीचे हब, सर्वोत्कृष्ट दर्जाची शिक्षण व आरोग्य व्यवस्था यासाठीचे केंद्र बनण्याची रायगडची क्षमता आहे. ही क्षमता विकसित करण्यासाठी आवश्यकता आहे. दूरदृष्टी धोरणांचा पाठपुरावा करण्याचा माझा तुम्हाला शब्द असल्याचे सांगितले होते. रायगड लोकसभा मतदारसंघात पुढील पाच वर्षात अमुलाग्र बदल दिसेल, असे म्हणणाऱ्या तटकरेंनी खरंच बदल केला का, याचे उत्तर तटकरेंनीच 2019 मध्ये जाहीर केलेल्या संकल्पपत्राचे वाचन केल्यानंतर दिसून येईल, अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे. सन 2019 मध्ये केलेल्या जाहीर सभातून सुनील तटकरे यांनी महाडमध्ये जनतेच्या सुविधेसाठी खासदारांचे अद्ययावत कार्यालय असेल, असे जाहीर केले होते; मात्र दुसरी निवडणूक आली तरी खासदारांचे कार्यालय महाडमध्ये झाले नाही. खासदारांच्या भेटीसाठी नागरिकांना सुतारवाडीच्या फेऱ्या माराव्या लागल्या. अशी अनेक वचने सुनील तटकरे यांनी महाडकरांना दिली होती. महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये अभियांत्रिकी उद्योग व्यवसाय आणून या औद्योगिक क्षेत्राला लागलेला रासायनिक प्रकल्पांचा डाग पुसून टाकण्याची भाषा देखील तटकरे यांनी केली होती. महाडजवळ असलेल्या वीर रेल्वे स्थानकाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी देखील अनेकदा सुनील तटकरे यांच्याकडे करण्यात आली होती. ही मागणी देखील केंद्राकडून पूर्णत्वास आणण्याचे प्रयत्न झाले नाहीत. महाडजवळ असलेल्या लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात संपूर्ण देशभरातील विद्यार्थी शिक्षण घेत असले तरी या ठिकाणी आजही अनेक पदांची गरज आहे. या ठिकाणी शेकडो एकर जमीन पडीक असल्याने अनेक वैविध्यपूर्ण कोर्स येणे आवश्यक होते; मात्र याकडेही त्यांनी कधी लक्ष दिले नसल्याचा आरोप मतदार करीत आहेत.
याशिवाय कोकणामध्ये आंबा काजू प्रक्रिया उद्योग क्लस्टर स्थापन करण्याचा आग्रह, रायगड विकास प्राधिकरणामार्फत रायगडावर जाण्यासाठी अद्यावत सुरक्षित आणि गतिमान तंत्रज्ञानाचा वापर करणारे रोपे वे, मिनी महाबळेश्वर अशी ख्याती असलेल्या दापोलीत चांगल्या प्रतीचे रस्ते, पर्यटनवृद्धीसाठी प्रयत्न, कोकणातील पर्यटन विकास हा पर्यावरणपूरक करण्याबाबत, प्रत्येक सरकारी शाळेत डिजिटल स्मार्ट क्लासरूम, लोकसेवा आयोगाच्या परीक्षा अभ्यासासाठी स्थानिक पातळीवर लोकसेवा आयोग अभ्यास केंद्र तसेच मरीन इंजीनियरिंग व नौदल अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण वर्ग, जहाज बांधणी व जहाज जोडणीचे प्रशिक्षण, किनारपट्टीजवळ वास्तव्य करणाऱ्यांच्या जीवित व मालमत्तेचे समुद्राच्या लाटांच्या माऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठीचा किनारा संरक्षण व व्यवस्थापन प्रकल्प, रोजगार निर्मिती, दळणवळणाच्या सुविधा, वॉटर स्पोर्ट, साहसी खेळांच्या सुविधा, घरगुती निवास व्यवस्थेला चालना, रोहा व दापोली येथे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल, बहुजन समाजाच्या कुळांचे प्रश्न, जातीचे दाखले आदी समस्यांना प्राधान्य याचबरोबर प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्यावरणसमृद्ध गावासाठी खासदार निधीचा बहुतांश वापर, प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आणि गावाचा विकास आराखडा तयार करून विकासकामे, हरित स्वच्छ व तंत्रज्ञानयुक्त रायगड, सर्व गावांची ऑप्टिकल फायबरने जोडणी, जागतिक तापमान वाढीच्या दुष्परिणामांवर नियंत्रण, तालुक्यांच्या ठिकाणी युथ होस्टेलची उभारणी अशा अनेक आश्वासनांची खैरात राष्ट्रवादीच्या अधिकृत जाहीरनाम्यावर तटकरे यांनी जनतेला दिली होती. त्यापैकी किती आश्वासनांची पूर्तता मागील पाच वर्षात तटकरे यांच्याकडून करण्यात आली, असा सवाल जनतेकडून उपस्थित केला जात आहे.