अतुल गुळवणी
9270925201
रायगडच्या राजकीय, सामाजिक, बँकींग, वृत्तपत्र सृष्टीत ज्या महिलांनी नावलौकिक मिळविला आहे त्यात सुप्रिया जयंत पाटील यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा बाणा अंगी बाळगलेल्या सुप्रिया पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाने आपल्याबरोबरच नाईक आणि पाटील घराण्याचे नाव उज्वल केलेले आहे.आज त्या 65 वर्षांच्या होत आहेत.गेल्या चार दशकातील त्यांच्या कार्याचा हा आलेख.
अलिबागमध्ये नाईक घराण्यातील कल्पना नाईक या ज्येष्ठ नेते स्व. प्रभाकर पाटील, स्व. सुलभाकाकू पाटील यांच्या परिवारात सुप्रिया पाटील या नावाने थोरल्या सुनबाईंच्या रुपात आल्या आणि आपल्या लाघवी स्वभावाने त्यांनी केवळ पाटील परिवारच नव्हे तर पाटील परिवाशी निगडीत असलेल्या सर्वच परिवाराला, तसेच शेकाप परिवाराला आपलेसे करुन टाकले. आजही कुटुंबप्रमुख, घरातील कर्ती महिला म्हणून त्या अत्यंत प्रामाणिकपणे कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आहेत. सुप्रिया पाटील यांची राजकीय कारकिर्द जिल्हा परिषदेपासूनच सुरु झाली. सन 1997 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्या कुर्डूस गटातून सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाल्या.त्यानंतर सन 1999 मध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होण्याचा बहुमानही त्यांनी मिळविला. ज्येष्ठ नेते स्व.प्रभाकर पाटील यांच्यानंतर जि.प.अध्यक्षपदी विराजमान होण्याचा बहुमान पाटील परिवाराला सुप्रिया पाटील यांच्या रुपाने मिळाला.त्यावेळी सन 1999 मध्ये तत्कालीन काँग्रेसमध्ये फूट पडली होती.काँग्रेसमधील माणिकराव जगताप, वसंतराव ओसवाल आदी नेतेमंडळींनी शेकापला साथ दिली होती.त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदी शेकापच्या सुप्रिया पाटील तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे माणिकराव जगताप हे विराजमान झाले. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर सुप्रिया पाटील यांनी जिल्ह्यातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचा संकल्प केला.त्यासाठी त्यांनी अथक परिश्रमही केले.जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून सार्या जिल्ह्याचा सखोल अभ्यास करुन दौराही केला. जिथे जिथे अडचणी आहेत त्या तात्काळ सोडविण्यासाठी त्यानी प्रयत्न केले.त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरुन टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचा मनोमन प्रयत्नही केला.प्रशासनाशी चांगले संबंध प्रस्थापित करुन अनेक प्रश्नही सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला.याच दरम्यान राज्यात सत्तेवर आलेल्या विलासराव देशमुख सरकारामध्ये शेकाप सहभागी झालेला होता.या सरकारात गणपतराव देशमुख,मोहन पाटील,मीनाक्षी पाटील हे तिघे मंत्री म्हणून कार्यरत होते.पण याच कालावधीत रायगड जिल्हा परिषदेतील शेकापसमवेतची आघाडी तोडून तत्कालीन काँग्रेस पुढार्यांनी शिवसेनेशी युती केली.त्यामुळे संतापलेल्या शेकापने विलासराव देशमुख सरकारचाच पाठिंबा काढून घेतला.आणि राज्यात एक मोठे राजकीय वादळच निर्माण झाले.अर्थात त्या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू अलिबाग येथे होता.जिल्हा परिषदेतील काँग्रेसने तोडलेल्या आघाडीचा फटका विलासराव देशमुख यांना बसला आणि मुख्यमंत्रीपद गमवावे लागले.त्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांचे सरकार सत्तेवर आले.आपल्याशी पंगा घेतलात तर राज्यातील सत्ता बदलू शकते हे शेकापने कृतीतून दाखवून दिले.त्यावेळी अनेक वृत्तपत्रातून रायगड जिल्हा परिषद राजकीय भूकंपाचे केंद्रबिंदू ठरले अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्धही झालेले होते. अध्यक्षपद गेले तरी सुप्रिया पाटील यांनी सामाजिक, बँकींग, वृत्तपत्र व्यवसायात आपले लक्ष केंद्रीत केले.रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या त्या दोन तपाहून अधिककाळ अध्यक्षा आहेत. शिवाय अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे.पत्रकार संघाच्या माध्यमातून रायगडात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला.रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाला ज्येष्ठ नेते, कृषीवलचे संस्थापक संपादक स्व.प्रभाकर पाटील,माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांनी खर्या अर्थाने नावारुपास आणले.भाऊंच्या कारकिर्दीत अनेक
दर्जेदार कार्यक्रम, मान्यवरांची व्याख्याने आयोजित केली जात असतं.तीच परंपरा सुप्रिया पाटील यांनीही सुरु ठेवली आहे. विविध पुरस्कारांचे वितरणही पत्रकार संघाच्या माध्यमातून केले जात आहे.यासाठी आवश्यक ते पाठबळ पुरविण्याचे काम सुप्रिया पाटील यांनी केलेले आहे.कृषीवलला स्थिरता निर्माण करुन देण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे.
अलिबाग अर्बन बँकेच्या माध्यमातून बँकींग क्षेत्रातही सुप्रिया पाटील यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.आज बँकेने बँकींग क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. महाराष्ट्र अर्बन बँक महासंघाच्या अध्यक्षपदाची धुराही सुप्रिया पाटील यांनी प्रभावीपणे सांभाळली आहे. महासंघाच्या पहिल्या महिला अध्यक्षा होण्याचा बहुमानही सुप्रिया पाटील यांनाच मिळाला हे आवर्जून नमूद करावेसे वाटते.
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून महिलांचे संघटन वाढविण्यातही त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला.पक्षाच्यावतीने ज्या ज्यावेळी आंदोलने करण्यात आली.त्यात सुप्रिया पाटील या नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत.कोणत्याही जाहीर कार्यक्रमांमध्ये व्यासपीठावर विराजमान न होता महिलांच्यासोबत राहून त्यांनी आपण तुमच्या सोबतच आहोत हे कृतीने अनेकदा दाखवून दिलेले आहे.
स्व.प्रभाकर पाटील यांनी राजकारणाच्या पलिकडे जाऊन अनेक मित्र निर्माण केले. त्यामुळे अलिबागला भेट देणारी राजकीय मंडळी पेझारीला सुशीला सदन या प्रभाकर पाटील यांच्या निवासस्थानी आवर्जून भेट देत असत.आजही ती परंपरा सुरु आहे.या आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करुन त्यांचा यथोचित पाहुणचार करण्याची परंपरा स्व.सुलभाकाकू यांनी घालून दिली त्या परंपरेचे सुप्रिया पाटील यांनीही तितत्याच आपुलकीने जतन केलेले आहे.त्यामुळे काकुंच्या पश्चातही सुशीलासदन मधील अतिथींचे आदरातिथ्य होत राहिलेले आहे.एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे संस्कारांची देवाणघेवाण झाल्याचे हे द्योतकच म्हटले पाहिजे.
आज त्या वयाची 65 वर्षे पूर्ण करीत आहेत.खर्या अर्थाने परिपूर्ण जीवन जगण्याचा आनंद त्यांना निश्चित लाभला असेल. राजकीय क्षेत्रात एक प्रभावी घराणे म्हणून पाटील परिवाराकडे पाहिले जाते. त्यामुळे नेहमीच चांगल्या,वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते अशावेळी घरातील कर्ती महिला जर दृढ निश्चयी असेल तर अशा कठीण प्रसंगातूनही सहीसलामतपणे बाहेर पडणे शक्य होते.सुप्रिया पाटील याबाबतीत निश्चितच यशस्वी ठरल्यात असेच अभिमानाने म्हणावे लागेल.सदैव हसतमुख चेहरा,प्रत्येकाशी आपुलकीने जोडलेले नातं यामुळे सुप्रियाताई या सर्वांनाच आधार वाटत आलेल्या आहेत.आज त्यांच्या वाढदिनी त्यांना उत्तम,निरोगी दीर्घायुष्य लाभो ही अलिबागची ग्रामदेवता श्री काळंबी चरणी मनोमन प्रार्थना.