महाडमधील सभेत सुषमा अंधारेंची जोरदार फटकेबाजी
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ पोलादपूर व महाडमध्ये गुरुवारी (दि.2) प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मोदी सरकारसह भरत गोगावले, नारायण राणे यांच्यासह देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे व महायुतीतील नेत्यांवर जोरदार फटकेबाजी केली.
यावेळी महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल नवगणे, शिव विचारवंत सुभान अली शेख, धनंजय देशमुख, तृप्ती रत्नपारखी, संदीप जाधव, सूर्यकांत शिलीमकर, नानासाहेब जगताप, सुरेश कळमकर, विनिता वर्फे, गजानन अधिकारी, गोपीनाथ ढोकळे, चेतन पोटफोडे यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापुढे सुषमा अंधारे म्हणाल्या की, गेल्या दोन दिवसांपासून ज्या प्रचारसभा पाहिल्या त्यावरुन ही निवडणूक जनतेनं हातात घेतली असल्याचं दिसून आलं. सध्या वातावरण फिरलंय, जनतेचं ठरलंय असंच चित्र पहायला मिळत आहे. महायुतीच्या सभांमधील भाषण ऐकल्यावर एक मुद्दा वारंवार बोलला जात आहे. मोदींना पंतप्रधान करायचंय. यासाठी ज्यांना 10/12 जागा मिळाल्या ते ही 48 जागांचा प्रचार करतात, ज्यांना चारच जागा मिळाल्या ते ही 48 जागांचा प्रचार करतात, जानकर साहेबांना एकच जागा मिळाली ते ही 48 जागांचा प्रचार करतात. आणि इंजिनवाल्या दादांना जागाच नाही, ते ही 48 जागांचा प्रचार करतात.
भरत गोगावले, नारायण राणे पैसा गोळा करण्यात इतके दंग झाले आहेत, की आपल्या लेकरांवर संस्कार करायलाच ते विसरले. विकास आणि त्याचा काहीही संबंध नाही असं नाव गोगावलेंनी ठेवले आहे, असा टोलाही सुषमा अंधारे यांनी गोगावलेंना लगावला. भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदे यांना मोठं करावं. सुनील तटकरे यांनी दादांना मोठं करावं, पण मोदींच्या नावाचा जप कशाला. हे म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाटण्यासारखं आहे, असे त्या म्हणाल्या.
महायुतीने महाडनगरीत सभा घेतली ती सभा लोकसभेच्या प्रचाराची कि नगरपालिका निवडणुकीची सभा होती, असा प्रश्न महाडकर जनतेला पडला होता. महाडकरणावरील उपकाराची भाषा तटकरेंना शोभत नाही. महाडवरील आपत्तीच्या प्रसंगात कौतुकाची थाप मिळविण्यासाठी शहरात फिरत नाही तर ते आमचे कर्तव्य आहे. महाडकरांना त्यांच्यासोबत कोण याची जाणीव आहे. यामुळे येत्या निवडणुकीत महाडकर त्यांचे कर्तव्य निश्चित बजावतील. माणिकराव जगताप यांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी महाडकर सज्ज झाला आहे, असे महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी सांगितले.
रायगड लोकसभा मतदार संघाच्या 2019 च्या निवडणुकीत सुनील तटकरेंच्या व्यासपीठावर येण्यास महाडचे आधारस्तंभ माणिकराव जगताप येण्यास तयार नव्हते. त्यांनी तटकरेंच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून गद्दारी रक्तात असणाऱ्यांसोबत जाऊ नका, असे सांगितले होते. त्याचा प्रत्यय महाराष्ट्रातील पक्ष फोडीच्या कारवायांमध्ये पाहावयास मिळाला. महाराष्ट्राची अस्मिता असणारे राजकीय पक्ष फोडण्यात टाकणारे अग्रेसर राहिले. शरद पवारांच्या गळ्यातील ताईत असलेल्या तटकरेंनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. अशा गद्दार असणाऱ्या तटकरेंना मतदारांनी जागा दाखवायला हवी. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मराठ्याचे रक्त सांडविणाऱ्या भाजप सरकारच्या उमेदवाराला हद्दपार करण्याची संधी रायगडच्या मतदारांना लाभली आहे, असे मत शिवव्याख्याते सुभानअली शेख यांनी व्यक्त केले.
महायुतीचे उमेदवार काळ्या पैशाचा वापर करून या निवडणुकीत जिंकण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु ज्यांनी गद्दारी केली आहे, त्यांना घरची वाट दाखविण्याचा निर्धार जनतेने केला आहे. ही परिस्थिती महाडमध्ये नव्हे, तर संपूर्ण लोकसभा मतदार संघात आहे. महाडमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या आदेशानुसार मदतीचा हात देण्यात आला. मात्र, खासदार आणि आमदार म्हणतात आम्ही मदत केली. परंतु, आताचे खासदार आणि आमदार यांनी स्वतःच्या झोळ्या भरण्याचे काम केले आहे. तटकरे कुटुंबियांचे त्या काळात गोडाऊन होते. आलेला निधी साहित्य त्यांच्या एजंटमार्फत गोडाऊनमध्ये टाकून करोडो रुपयांची लूट करण्याचे काम त्यांनी केले. असा आरोप शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे अनिल नवगणे यांनी केला.
चहापेक्षा किटली गरम
आजकाल नेत्यांपेक्षा त्यांचे भक्तुल्ले जास्त उडत आहेत. नेत्याच्या सांगण्यावरुन भाष्य करीत आहेत. चहापेक्षा किटली गरम अशी अवस्था झाली आहे. मात्र, अशा किटल्यांचा योग्य तो बंदोबस्त लावणं आम्हाला बरोबर जमतं. मातोश्रीचा हात डोक्यावर होता, म्हणून मान होता. मात्र, आता चक्रवाढ व्याजासह परतफेड करु, असा सज्जड इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नाव न घेता गोगावले आणि तटकरेंच्या कार्यकर्त्यांना भरला.
आदितीताई…सुनील तटकरेंच्या जीवावर उडायचं नाही
आदितीताई या सुनील तटकरेंच्या जीवावर बोलतात. त्यांच्या पाठबळामुळे त्यांच्यात बळ येतं पण सुषमा अंधारे स्वतःच्या ताकदीवर बोलते. खरं सांगायचं तर कळप लांडग्यांचे असतात, वाघिण एकटीच येते आणि लढतेही, असा टोला सुषमा अंधारे यांनी आदिती तटकरे यांना लगावला.
तटकरेसाहेब उत्तर द्या
© स्मार्ट सिटीचं काय झालं?
© आदर्श ग्रामयोजनेचं काय झालं?
© 100 टक्के शौचालय पूर्ण होणारे जिल्हे दाखवा?
© 100 कि.मी.चा रस्ता पूर्ण होणारी राज्ये कोणती?
© जनधन खात्यात 15 लाख जमा होणाऱ्या 9 बँका कोणत्या?
© नव्याने विजनिर्मिती प्रकल्प सुरु होणारी 9 क्षेत्रे कोणती?
© मुलांना सरकारी शाळेत शिकविणारे 9 मंत्री कोण?
© ईडीची धाड पडलेले भाजपचे 9 नेते सांगा?
© शेतकऱ्यांनी आत्महत्या न झालेेले 9 जिल्हे कोणते?
© गंगेचं स्वच्छ केलेले 9 कि.मी.चे सलग क्षेत्र कोणते?
© 100 टक्के सिंचन पूर्ण झालेले 9 जिल्हे कोणते?