काँग्रेसकडून तहसीलदारांना मागणीचे निवेदन
| नेरळ | प्रतिनिधी |
काँग्रेस पक्ष सरसावला असून, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून मतांच्या चोरीबद्दल देशभर आंदोलने केली आहेत. त्यात कर्जत तालुका काँग्रेस कमिटीने तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदन दिले. आगामी सर्व निवडणुकीसाठी मतदान ही बॅलेट पेपरवरच व्हावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
कर्जत तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी यांनी राहुल गांधी यांना अटक करण्यात आल्याबद्दल संताप व्यक्त केला. त्यानंतर तालुका अध्यक्ष संजय गवळी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार डॉ. धनजंय जाधव यांची भेट घेऊन आगामी काळातील सर्व निवडणुकांमधील होणारे मतदान हे बॅलेट पेपर वर व्हावे अशी मागणी केली. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्ते तालुका अध्यक्ष-संजय गवळी, माजी तालुका अध्यक्ष अरविंद पाटील, माजी तालुका अध्यक्ष मुकेश सुर्वे, ज्येष्ठ कार्यकर्ते दीनानाथ देशमुख, सूरज पंडित, अनंत देवळे, सुभाष मदन, संदीप पाटील, जकी नजे, मंगल माळी, गणपत सांगडे, माजी शहर अध्यक्ष विजय हरिश्चंद्र, पठाण चाचा संतोष सूरवसे आदी उपस्थित होते. यावेळी काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात राज्य विधानसभेच्या निवडणुकीतील वाढलेल्या मतांबद्दल शंका घेतली.
काँग्रेस पक्षाने दिलेल्या निवेदनात नुकताच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये संशयास्पद मतदान झाल्याचे आढळून आले. विरोधी पक्ष नेता राहुल गांधी यांनी काही दिवसापूर्वी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये पुराव्यासहित स्पष्ट केले. मतचोरी होणे हा लोकशाहीचा खूप मोठा घात आहे. अशा प्रवृत्ती मुळे चुकीच्या लोकांचे राज्य देशात सत्तेत येते व देशाची प्रगती थांबते व नागरिक असंतुष्ट राहतात. त्यामुळे देशात अंतर्गत युद्ध, मांडणे, होण्याची व बराजकता माजण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही अशी भीती आपल्या अर्जात व्यक्त केली आहे. जर देशातील नागरिकांमध्ये आपापसात दोन गटात / समुहात वाद नको असतील शांतता सुव्यवस्था हवी असेल तर तत्काळ हि ई. व्ही. एम. मशीत बंद करण्यासाठी आपण अधिकारी वर्गाने पुढाकार घेऊन बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात असे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात यावा.
त्यामुळे ई.व्ही.एम. विरोधात संपूर्ण देशात छोट्या छोट्या ग्रामीण भागात आंदोलन संसदेपर्यंत पोहचवून सरकारची कानउघडणी करावी तसेच जनसमुदायाचा आक्रोश असल्याने पुढील निवडणुका या बॅलेट पेपर वर घेण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी केली. हे निवेदन देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कर्जत शहरातून पायी चालत प्रशासकीय भवन येथे पोहोचले.







