| मुंबई | प्रतिनिधी |
पावसाळ्यात दरड, रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, पाणी तुंबणे हे प्रकार नवीन नाहीत. बुधवारी (दि.5) सकाळी मुंबईतील चेंबूर परिसरात जमीन खचल्याचा प्रकार घडला. यामध्ये जवळपास 40 ते 50 बाईक, चार-पाच चारचाकी गाड्या पडल्या. यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमन नगर प्रियदर्शनी पार्कजवळ हा प्रकार घडला. धक्कादायक म्हणजे 40 ते 50 मोटरसायकल आणि चार-पाच कारही या खचलेल्या खड्डयात कोसळल्या आहे.
ही घटना ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर चुनाभट्टी भागात वसंतदादा पाटील इंजिनियर कॉलेजसमोरील राहुल नगर भागात असलेल्या एसआरए बिल्डिंग समोर झाली आहे. जागा खचल्याने आजूबाजूच्या इमारतींतील नागरिकांनी आपाआपल्या घरातून बाहेरचा रस्ता धरला.
रौनक ग्रुपचे काम सुरु असताना अचानक रस्ता 25 फूट खोलपर्यंत खचला. रस्ता खचल्यानंतर संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे. एसआरए इमारतीत राहणाऱ्या काही रहिवाशांची वाहनेही खचलेल्या खड्डयात कोसळली आहेत. घटनास्थळीत मुंबई अग्निशामक दल, पोलिस कर्मचारीवर्ग उपस्थित आहेत.