मिरा भाईंदर भाजपात नाराजी
| भाईंदर | प्रतिनिधी |
ठाणे लोकसभा जागेवर शिवसेनेचा उमेदवार घोषित झाल्यामुळे मिरा भाईंदर भाजपमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे याचा थेट फटका महायुतीच्या प्रचारावर होणार असल्याची शक्यता आहे.
ठाणे लोकसभा क्षेत्रात भाजपची वाढलेली संघटनात्मक ताकद पाहता ही जागा आपल्या वाटेलाच यावी, अशी मागणी भाजप कार्यकर्ते व पदाधिकार्यांकडून मागील काही दिवसापासून आक्रमकपणे करण्यात येत होती. तर मिरा भाईंदर भाजप पक्षाने शिवसेना उमेदवारासाठी काम करणार नसल्याचे थेट जाहीर केले होते. त्यामुळे या जागेवरून भाजप- शिवसेनेत रस्सीखेच सुरु असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर ही जागा शिवसेनेला स्वतःकडे ठेवण्यात यश आले असून नरेश म्हस्के यांच्या नावाची अधिकृत उमेदवार म्हणून बुधवारी घोषणा करण्यात आली आहे. मात्र ही घोषणा झाल्यानंतर मिरा भाईंदर भाजपच्या गोट्यात नाराजीचे वातावरण पसरले आहे. इतकेच नव्हे तर सक्रिय कार्यकर्ते एकत्र जमत असून पुढील निर्णय घेण्यासाठी पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाची वाट बघत आहे.
ठाणे लोकसभेसाठी भाजपतर्फे संजीव नाईक हे इच्छुक होते. गेल्या काही दिवसातच त्यांनी हा मतदारसंघ पिंजून काढत पहिल्या टप्प्यातील प्रचार देखील पूर्ण केला होता. त्यामुळे नाईकच हे आगामी निवडणूक लढवणार असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र एकाएकी शिवसेनेचा उमेदवार घोषित झाल्यामुळे भाजपात नाराजी पसरली आहे.