। मुंबई । वृत्तसंस्था ।
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाने मंगळवारी तुर्तास दिलासा दिला आहे. पालिकेने दिलेल्या अनधिकृत बांधकामावर तुर्तास कारवाई करु नये, असा आदेश हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दिला आहे. हायकोर्टाने म्हटले की, मुंबई महापालिकेच्या नोटिसीला उत्तर देताना आपलं बांधकाम नियमित करण्यासाठी पालिकेकडं जो अर्ज केला आहे, त्यावर कायदेशीररित्या पालिकेनं सुनावणी घेऊन निकाल देणं बंधनकारक आहे. ती सुनावणी घेऊन त्यांनी तातडीनं निकाल द्यावा आणि हा निकालही नारायण राणेंच्या विरोधात गेला तर त्यावर तीन आठवड्यांपर्यंत कुठलीही कारवाई करु नये. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे पुढील तीन आठवड्यात नारायण राणे यांच्याकडे पुन्हा कोर्टात दाद मागण्याचा पर्याय खुला असेल. त्यामुळे नारायण राणेंच्या याचिकेवर हायकोर्टाने सुनावणी घेत पालिकेला सध्यातरी कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले, यामुळे नारायण राणे यांना दिलासा मिळाला.