| रायगड | प्रतिनिधी |
एकीकडे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू असताना दुसरीकडे मतदानाच्या दिवशी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळवही केली जात आहे. यामध्ये मतदान शाईचाही समावेश आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांत एकूण सात हजार शाईच्या बाटल्या लागणार आहेत. या लोकशाही उत्सवात मतदारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघ हा रायगड आणि रत्नगिरी या दोन जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे. या ठिकाणी दुर्गम, अतिदुर्गम भाग असल्याने अशा ठिकाणी मतदान केंद्रात पोहचण्यासाठी व्यवस्था केली जाणार आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक 7 मे रोजी होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून निवडणूक आयोगाचे निर्देश आणि मार्गदर्शनाखाली काम सुरू केले आहे. यासाठी सामानांची केंद्रावर ने-आण सुरू आहे. यात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शाईच्या बाटल्याही मागवल्या जाणार आहेत. प्रत्येक मतदार केंद्रात दोन शाईच्या बाटल्या असणार आहेत.
निवडणुकीची धामधूम सुरू असताना जिल्हा प्रशासनानेही कामकाज जोरात सुरू केले आहे. नवमतदार, मतदार ओळखपत्र फोटो, पत्ता दुरुस्ती; तसेच अन्य तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात मोहीम राबवण्यात आली होती. सोमवारी नोंदणीचा शेवटचा दिवस होता. नवीन मतदारही वाढले आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क नवमतदारांना बजावता येणार आहे.
पोलिसांना प्रशिक्षण
निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे. याशिवाय, मॉकड्रिलही केले जात आहे. ज्यात विविध प्रात्यक्षिके केली जात असून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघावर दृष्टिक्षेप
मतदार - 16 लाख 68 हजार 372
मतदान केंद्र - 2 हजार 185
शाईच्या बाटल्या - 7 हजार
कर्मचारी -17 हजार 518
जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीचे काम सुरू आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. हा आपला लोकशाही उत्सव आहे. मतदानाचा हा अधिकार आपल्याला प्राप्त झाला आहे. त्यामुळे मतदारांनी लोकशाही उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे.
किशन जावळे, जिल्हाधिकारी