क्रिकेटच्या पंढरीत कसोटी विजयाचा गजर

‌‘लॉर्ड्स’वर भारतीय महिला ‌‘बॉस’

| लॉर्ड्स | वृत्तसंस्था |

142 वर्षांत पहिल्यांदाच क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यात भारताच्या महिला संघाने दणदणीत विजय नोंदवला. भारत आणि इंग्लंड महिला संघांमधील या एकमेव कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या लेकींनी पहिल्या डावापासूनच आपली पकड मजबूत ठेवली. अखेरीस कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने 270 धावांनी दमदार विजय मिळवला. यासह लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर कसोटी सामना जिंकणारा जगातील भारत हा पहिला महिला संघ ठरला.

यास्तिका भाटिया, क्रांती गौड व स्मृती मानधना भारताच्या या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. याशिवाय भारताच्या प्रत्येक खेळाडूने आपली जबाबदारी चोख बजावत भारताच्या या ऐतिहासिक कसोटी विजयात मोलाची भूमिका बजावली. भारताच्या गोलंदाजांचं या विजयात मोठं योगदान आहे. भारताचा हा ऐतिहासिक विजय पाहण्यासाठी आणि संघाचं खास कौतुक करण्यासाठी लॉर्ड्स स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर, आयसीसी चेअरमन जय शाह व बीसीसीआयचे देवजीत सैकिया ही मंडळी उपस्थित होती.

नताली सायव्हर ब्रंटच्या नेतृत्त्वाखालील इंग्लंड महिला संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात 285 धावा केल्या आणि इंग्लंडचा संघ प्रत्युत्तरात 170 धावांवर सर्वबाद झाला. यासह टीम इंडियाला 115 धावांची आघाडी मिळाली, तर दुसऱ्या डावात यस्तिका भाटियाच्या विक्रमी शतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने 341 धावा करत डाव घोषित केला आणि इंग्लंडला विजयासाठी 457 धावांचं मोठं आव्हान दिलं. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 186 धावा करत सर्वबाद झाला.

भारताने विजयासाठी दिलेल्या 457 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचे टॉप-5 फलंदाज स्वस्तात माघारी परतले. क्रांती गौड, सायली सातघरे व स्नेह राणा यांनी इंग्लंडला धाव करण्याची संधी दिली नाही. यष्टीरक्षक ॲमी जोन्स व गोलंदाज सोफी एक्सलस्टन यांनी अर्धशतकी खेळी केल्या. तर मॅडी विलियर्सने 26 धावांचं योगदान दिलं. तर भारताकडून स्नेह राणाने दुसऱ्या डावात 4 विकेट्स घेतल्या. तर सायली सातघरे, क्रांती गौड व दीप्ती शर्मा यांनी 2-2 विकेट्स घेतल्या.
भारताने पहिल्या डावात 285 धावा केल्या; यात स्मृती मानधना हिच्या 83 धावांच्या शानदार खेळीचा विशेष वाटा होता. कर्णधार हरमनप्रीत कौरने 58 धावा केल्या, तर दीप्ती शर्माने 57 धावांचं योगदान दिलं. याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 170 धावांत आटोपला. क्रांती गौडने 37 धावांत 5 विकेट्स घेत निर्णायक भूमिका बजावली, तर सायली सतघरे आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

पहिल्या डावात 115 धावांची आघाडी घेतल्यानंतर, भारतीय संघाने दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारली. यस्तिका भाटियाने 158 चेंडूंत 113 धावांची शतकी खेळी केली, तर स्मृती मानधनाने पुन्हा एकदा 70 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर रिचा घोषने 52 चेंडूंत 50 धावांची आक्रमक खेळी केली. परिणामी, भारताने आपला दुसरा डाव 7 बाद 341 धावांवर घोषित केला आणि इंग्लंडसमोर विजयासाठी 457 धावांचे कठीण आव्हान उभं केलं.

Exit mobile version