तालुक्यातील वातावरण झाले निरभ्र
पर्यटकांची मुरूडला अधिक पसंती
। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
अवकाळीनंतर मुरूड तालुक्यातील वातावरण अनुकूल होत असून, पर्यटकांची अधिक पसंती मुरूडला मिळत असल्यामुळे मुरूडमधील समुद्रकिनारे पुन्हा एकदा गजबजणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
थंडीच्या ऐन हंगामात टाळेेबंदीच्या शिथिलतेनंतर सुरू झालेले मुरूड तालुक्यातील पर्यटन एकाकी झालेल्या वातावरण बदलामुळे थंडावण्याच्या मार्गावर होते. पण आता वातावरण अनुकूल होत असल्यामुळे पर्यटकांचा ओढा मुरूड तालुक्यातील समुद्रकिनार्यांकडे वळू लागला आहे. निसर्गराजीने सजलेला मुरूड तालुका मिनी गोवा म्हणून प्रसिद्ध आहे. तालुक्यातील नांदगाव, काशीद, बोर्ली, मुरूड असे विविध समुद्रकिनारे पर्यटकांच्या विशेष पसंतीचे आहेत. यात बच्चेकंपनीची शाळा डिसेंबरपासून सुरू होत आहे. यामुळे टाळेबंदीच्या काळात घरताच कोंडी झालेल्या बच्चेकंपनी समुद्रक्रीडेचा आनंद लुटण्याची संधी मिळाली आहे. यामुळे आपल्या कुटुंबासोबत विकेंड हॉलीडे किंवा इतर सुट्ट्यांचा आनंद उपभोगण्यासाठी मुंबई, पुणे परिसरातील व्यक्तींचा ओढा मुरूडकडेच अधिक असल्याचे पाहावयास मिळत आहे.
काशीद समुद्रकिनारा परिसरात लॉजिंग बुकींग हाऊसफुल्ल होत आली आहे. याशिवाय, एकांत तसेच शांतता अपेक्षित असणार्या पर्यटकांना नांदगावचा समुद्रकिनारा खुणावत असल्याचे चित्र आहे. मुरूड ते अलिबाग हे अंतर रस्त्याने 50 किमी आहे. परंतु हेच अंतर जलमार्गाने जोडले तर 20 किमी होऊ शकते. या भागात आगरदांडा ते दिघी पूल, बागमांडला ते बाणकोट खाडीवरील पूल आता जलद वेळेत पूर्ण झाल्यास पर्यटन मोठया प्रमाणात वाढू शकेल.
दिघी- आगरदांडा बंदर प्रकल्प देखील होणार असून या सर्वांचा मोठा उपयोग भविष्यात होणार आहे.जवळचा मार्ग आणि जागोजागी मजबूत रस्ते, पूल होणे आवश्यक आहे.सर्व सुविधा असतील तर आम्हाला आपले सुंदर कोकण सोडून गोव्यात जाण्याची आवश्यकता उरणार नाही अशा भावना मुरूड समुद्रकिनार्यावर शुक्रवारी मुंबई, पुण्यातील पर्यटकांनी बोलताना व्यक्त केल्या आहेत.