दुचाकीच्या अपघातात मुलाचा जागीच मृत्यू

। रत्नागिरी । वार्ताहर ।
तालुक्यातील खंडाळा येथे बुधवारी संध्याकाळी बल्गर आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दहा वर्षीय चिमुरड्याचा जागीच करुण मृत्यू झाला. तर दुचाकी चालविणारे आजोबा जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने येणार्‍या बल्गरने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.
या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी जिंदाल कंपनीच्या अवजड वाहतुकीला आक्षेप घेत रस्तारोको केला आहे. सध्या खंडाळा परिसरात तणावाचे वतावरण असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
जयगडस्थित जिंदाल कंपनीच्या जेटीवरुन येणार्‍या अवजड बल्गर चालकाने भरधाव वेगाने जात होता. तर कोळीसरे येथील माजी सैनिक आर डी तथा रामचंद्र देमाजी सावंत हे आपल्या ऍक्टिव्हा दुचाकी गाडीने कोळीसरे ते खंडाळा या ठिकाणी आपल्या खाजगी कामानिमित्ताने चालले होते. खंडाळा येथील महावितरण कार्यालया जवळ त्यांच्या दुचाकीला बल्गरने मागून जोरदार धडक दिली. बल्गरची धडक इतकी जोरात होती की दुचाकीवर मागे बसलेला दर्शिल प्रमोद सावंत या शाळकरी चिमुरड्याचा रस्त्यावर आदळून जागीच मृत्यू झाला तर आजोबा रामचंद्र सावंत हे जखमी झाले आहेत.

Exit mobile version