। अलिबाग । प्रतिनिधी ।
मोबाईलच्या दुनियेत रमणारी बच्चे कंपनी सुट्टीमध्ये शेतावर जाऊन वेगवेगळ्या फळांचा आनंद घेत आहेत. अनेक तरुणांसह बच्चे कंपनी शेतावर जाऊन जांभळे, करवंदे व रायवळी आंबे खाण्याचा आनंद लुटत आहेत.
शाळांना सुट्टी पडली आहे. काहीजण मामाच्या गावासह अन्य ठिकाणी फिरण्यास गेले आहेत. तर काही जण सुट्टीचा आनंद घालविण्यासाठी गावी दाखल झाले आहेत. रायगड जिल्ह्यात रायवळी आंबे, जांभळे व करवंदे या हंगामात मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. आपल्या कुटुंबीयासमवेत गावी फिरण्यास आलेली बच्चे कंपनी गावांतील मुलांसोबत शेतावर फिरण्याचा आनंद घेत आहेत. शेतावर गेल्यावर झाडावर लटकलेले जांभूळ काढणे, झुडपातील पिकलेले करवंद, रायवळी आंबे दगड मारून, किंवा झाडावर चढून काढण्यामध्ये मग्न होऊ लागली आहेत. एक वेगळा आनंद यातून घेण्याचा प्रयत्न ही बच्चे कंपनी घेत आहेत. सध्या अनेक बच्चे कंपनी मोबाईलमध्ये रमत आहेत. त्यामुळे उन्हाळी सुट्टीत शेतावर जाऊन आंबे, करवंद, जांभळे खाण्याचा आनंद कालबाह्य होण्याच्या मार्गावर होता. मात्र हा आनंद आजही जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पहावयास मिळत आहे.