उसाचा रस, लिंबू सरबत पिण्याकडे कल वाढला
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
उन्हाचा तडाखा वाढल्याने अंगाची होणारी काहीली मिटवण्यासाठी नागरिक शीतपेय पिण्याला पसंती देऊ लागल्याने शीतपेयाना मागणी वाढली असून, लिंबू सरबत, उसाच्या रसाच्या दुकानावर नागरिकांची गर्दी वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे नागरिक हैराण होत आहेत. त्यामुळे विविध ठिकाणी थंडपेयांची दुकाने थाटली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी नागरिकांनी उसाच्या रस, लिंबू पाणी व कोकम सरबतला अधिक पसंती आहे. सर्व स्टॉलवर दोन्ही पेय हमखास मिळत आहेत. कामानिमित्त येणारे बहुतांश नागरिक उपनगरात गाडीने प्रवास करतात. काही मोक्याच्या ठिकाणी असलेल्या स्टॉलवर मोसंबी, गाजर तसेच इतर फळांचा ज्यूस पिण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्याचे दिसत आहे. तर बच्चेकंपनी कालाखट्टा, कच्ची कैरी, मिल्क शेक तसेच बर्फाचा गोळा खाण्याचा आनंद घेत असल्याचे चित्र शहरांमध्ये दिसत आहे.
रसवंतीवर नागरिकांची गर्दी
शहरात ठिकठिकाणी रसवंतीची दुकाने सुरू झाली आहेत. उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी नागरिकांनी ऊसाच्या रसाला पसंती दिली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर ऊसाच्या रसाची दुकाने आहेत. या रसवंतीगृहावर प्रवाशांची गर्दी होत आहे.
ऊस, मोसंबीच्या रसाला ग्राहकांनी पसंती
नागरिक कोल्ड्रिंक्सला नकार देत ऊस, मोसंबीच्या रसाला ग्राहकांनी पसंती दिली आहे. तापमान वाढले की थंड पेय बनविणार्या विविध देशी विदेशी कंपन्यांची ‘चांदी’ असते. मात्र, नागरिकांनी या शीतपेयांकडे काहीशी पाठ फिरवल्याचे चित्र विक्रेते अकबर शेख यांनी सांगितले.
उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे उन्हाळ्यात शहरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते, त्यामुळे शरीराची तहान भागविण्यासाठी लिंबू सरबत, उसाचा रस, सरबत आदींसह दुग्धजन्य थंडपेयांची मागणी वाढली आहे.
पप्पू पटेल,
दुकानदार
उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. मी तर दिवसातून दोन ग्लास ताक घेत आहे. कधी उसाचा रस पीत आहे. इतक्या उन्हात थंडपेयाची गरज असते.
कामेश भगत,
नागरिक.