| रत्नागिरी | प्रतिनिधी |
एसटी प्रवासादरम्यान वाहकांसोबत सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद टाळता यावेत यासाठी एसटी महामंडळाकडून नामी शक्कल शोधून काढण्यात आली आहे. एसटी महामंडळाने आता प्रवासी भाडे तिकिट हे 5 ते 10 रुपयांच्या पटीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.
खासगी प्रवासी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आजही एसटीला प्रवाशांची पसंती मिळत आहे. विशेष करून ग्रामीण भागातील प्रवासी आजही एसटीवर अवलंबून आहेत. मात्र, तिकीटदर प्रतिकिलोमीटरनुसार असल्याने प्रवासी व वाहक यांच्यात वाद निर्माण होत असतात. काही वेळा हे वाद अगदी हाणामारीपर्यंतदेखील जात असताना यावर उपाय योजण्यासाठी एसटी महामंडळाकडून तिकिटदर 5 व 10 रुपयांच्या पटीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे एसटी महामंडळाकडूनदेखील हायटेक होत ऑनलाईन तिकिट बुकींग, गुगलपे, फोन पे, पेटीएम, भीमऍप अशा माध्यमातूनदेखील तिकिटाचे पैसे स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. मात्र, ग्रामीण भागात मोबाईल फोन यांना नेटवर्क मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे ऑनलाईन पैसे देण्यात अडचणी येत आहेत. अशा वेळी एसटी महामंडळाकडून 5-10 रुपयांच्या पटीत तिकिट आकारणी करण्याचा निर्णय घेतला असल्याने सुट्ट्या पैशांचा वाद काही अंशी कमी होण्यास मदत होणार आहे. सुट्ट्या पैशांच्या या प्रश्नावर महामंडळाने यावर तोडगा काढल्याने समस्त वाहकांना दिलासा मिळाला आहे.






