खा.विनायक राऊत यांचा विश्वास
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसोबतच सहकार क्षेत्रातील निवडणुका येऊ घातल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, याच पार्श्वभूमीवर, आमागी निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व 19 संचालक महाविकास आघाडीचे निवडून येतील, असा विश्वास शिवसेना खा. विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून, यातील महाविकास आघाडीच्या भूमिकेसंदर्भात माहिती देण्यासाठी शरद कृषी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. दीपक केसरकर, आ. वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, राष्ट्रवादीचे व्हिक्टर डांटस, काँग्रेसचे विद्याप्रसाद बांदेकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, जान्हवी सावंत, नागेंद्र परब, संजय आंग्रे, आर. टी. मर्गज, मनीष पारकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले की, जिल्हा बँकेची 2015 मध्ये पंधराशे कोटी उलाढाल होती. गेल्या पाच वर्षांत त्यात 900 कोटींची वाढ झाली असून 2400 कोटींवर उलाढाल पोचली आहे. सतीश सावंत यांनी संचालकांच्या समन्वयातून या कालावधीत शेतकरी हिताचे निर्णय घेतले. त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक कारभार करणारी राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा बँक ठरली आहे. जिल्हा बँक निवडणूक विकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेत जागावाटप निश्चित केले होते. त्यानुसार जिल्हा बँक निवडणूक लढविण्यात येत आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील मतदार पुन्हा सावंत यांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व संचालक निवडून देतील, असा मला विश्वास आहे.
तर यावेळी आ. केसरकर यांनी आ. नितेश राणे यांच्यावर टीका करताना जे स्वतःच्या संस्थेचे कर्ज फेडू शकले नाही, स्वतः कर्जदार आहे ते बँक काय चालविणार? असा प्रश्न केला.
तसेच जिल्हा बँक संचालक प्रकाश गवस यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबाबत विचारले असता, त्यांनी प्रकाश गवस यांची संस्था 36 लाख रुपये देणे होती. ते पैसे एका दिवसात भरले गेले. अशाप्रकारे जिल्ह्यातील विविध संस्थांनी अडीच कोटी थकीत रक्कम भरली. एवढी रक्कम आली कुठून, कोणी पैसे दिले, हा प्रश्न निर्माण होत आहे. अशाप्रकारे अडीच कोटी रुपये थकीत रक्कम कोणीतरी व्यक्तीने भरली असल्यास तो त्याचा फायदा घेणारच आहे, असेही केसरकर म्हणाले.