। राजापूर । वृत्तसंस्था ।
नव्या वर्षाच्या आरंभाला तालुक्यातील वेत्ये येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची अंडी सापडलेली होती. याच ठिकाणच्या समुद्रकिनारी पुन्हा एकदा कासवाची 113 अंडी सापडली आहेत. कासवमित्र गोकूळ जाधव यांनी वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली किनार्यावर घरटे करून योग्य पद्धतीने त्यांचे संवर्धन केले आहे. वेत्ये किनार्यावरचे यावर्षीच्या हंगामातील ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांच्या अंड्यांचे दुसरे घरटे झाले आहे.
तालुक्याच्या वेत्ये, आंबोळगड समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची मादी अंडी घालण्यासाठी येत आहे. मात्र, यावर्षीचा अवकाळी पाऊस आणि बदललेले वातावरण यामुळे कासव उशिरा अंडी घालण्यासाठी येण्याचा अंदाज वर्तवला जात होता. त्याप्रमाणे यावर्षीच्या सुरूवातीला वेत्ये समुद्रकिनारी कासवाची अंडी आढळली. यातून वेत्ये किनारी यावर्षीचे पहिले कासवाच्या अंड्यांचे घरटे झाले. त्यानंतर आंबोळगड समुद्रकिनारीही कासवाची अंडी आढळून आली. आज पुन्हा एकदा वेत्ये समुद्रकिनारी कासवाची अंडी आढळून आली. वेत्ये समुद्रकिनारी गेल्या कित्येक वर्षे कासवाच्या अंड्यांचे संवर्धन करण्यामध्ये कासवमित्र जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
पहाटेच्यावेळी समुद्रकिनारी नेहमीप्रमाणे फेरफटका मारत असताना त्यांना वाळूमध्ये कासवांच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसले. त्या पावलांच्या ठशांच्या अनुषंगाने पाहणी करताना त्यांना कासवाची अंडी आढळून आली. त्यांनी तत्काळ राजापूर वनविभागाचे वनपाल सदानंद घाटगे, सागर गोसावी आदींशी संपर्क साधून त्याबाबतची माहिती दिली. किनार्यावरील वन्यप्राणी वा जंगली श्वापदांपासून कासवांच्या अंड्यांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली अंड्यांचे सुरक्षित ठिकाणी संवर्धन करून ठेवले आहे. या अंड्यांमधून आता सुमारे 55 दिवसांनी पिल्ले बाहेर येणार असून या कासवाच्या पिल्लांचा समुद्रप्रवास पर्यटकांसह ग्रामस्थांना अनुभवता येणार आहे.