शेतांमध्ये पसरली जांभळ्या मंजिरीची सुगंधी दुलई

| पाली /बेणसे | प्रतिनिधी |

पाली सुधागड सह रायगड जिल्ह्यातील काही शेतांमध्ये जांभळी मंजिरीची आकर्षक व सुगंधी फुले बहरली आहेत. आजूबाजूच्या परिसरात जांभळ्या मंजिरीचा सुगंध दरवळत आहे. जिल्ह्यात जांभळ्या मंजिरीचे क्षेत्र वाढले असल्याचे निरीक्षण निसर्ग अभ्यासकांनी नोंदविले आहे. निसर्गाचा हा विलोभनीय आविष्कार पाहण्यासाठी अनेक अभ्यासक व निसर्ग प्रेमींची रेलचेल पहायला मिळत आहे. जांभळी मंजिरी ही पाण वनस्पती असून हिचे शास्त्रीय नाव पोगोस्टेमॉन डेक्क्नेनसिस असे आहे. सुप्रसिद्ध कास पठारावर ही मुबलक प्रमाणात आढळते परंतु फुलोरा मात्र सप्टेबर ते ऑक्टोबर या महिन्यात येतो. तर कोकणात रायगड जिल्ह्यात आढळणारी जांभळी मंजिरी भात कापणी झाल्यावर रुजून येते व फुलोरा मात्र नोंव्हेबर व डिसेंबर असा सुरू होतो. हा बदल अधिवास वेगळा असल्याने होतो. जिल्ह्यात सुद्धा सड्यावर होणारी मंजिरी लवकर फुलते. असे जिल्ह्यातील प्रसिद्ध निसर्ग अभ्यासक प्रवीण कवळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

संपूर्ण शेत किंवा शेताचा काही भागावर फुलेली ही मनमोहक फुले पाहून जणु काही जांभळया रंगाची झालरच पांघरली आहे असे वाटते. आजूबाजूच्या परिसरातही मंजिरीचा सुवास दरवळत असतो. परिणामी ही मनमोहक व आकर्षक फुले अनेकांचे लक्ष वेधून घेतात. येथून जाणारे अनेक प्रवासी व वाटसरू मंजिरीची ही जांभळी झालर पाहण्यासाठी आवर्जून थांबतात. काहीजण तर येथे नियमित देखील येतात. जांभळ्या मंजिरीचा हा अद्भुत नजारा काही दिवसच पहायला मिळतो फेब्रुवारी नंतर हवामानात बदल होऊ लागला की ही फुले व झुडपे सुकून जातात. आणि पुढील वर्षी पावसाळा सरल्यावर व हिवाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा जांभळी मंजिरी बहरते. बुटकी आणि झुडुपवजा असलेल्या या झाडांची पाने हिरव्या रंगाची असतात. यांना आकर्षक रंगाची जांभळी फुले तुर्‍यांप्रमाणे येतात. सकाळी धुक्याचे दवबिंदू या फुलांवर पडल्यावर ते अधिकच आकर्षक व खुलून दिसतात.

सुगंधी तेल व अत्तर जांभळ्या मंजिरीची झाडे सुगंधी द्रव्याने युक्त असतात. त्यामुळे यापासून वेगवेगळी सुगंधी तेल काढली जातात. तसेच सुगंधी द्रव्य बनविण्यासाठी देखील वापरले जाते.
क्षेत्र वाढतेय जिल्ह्यात जांभळी मंजिरी चे प्रमाण जास्त जाणवू लागले आहे. त्यांची दोन तीन कारणे आहेत. पहिले म्हणजे ती पूर्वीपासून आहेच, पण कास पठार प्रसिद्ध झाल्यापासून अनेकजण तिला आवर्जून बघायला लागले. तसेच दुसरे कारण म्हणजे जिल्ह्यात शेती करण्याच्या पद्धती बदलत चालल्या आहेत पूर्वी बहुतांश शेतकरी भात पीक घेतल्यानंतर दुबार पीक म्हणून वाल. हरभरा. चवळी किवा मुग वगैरे सारखी पिके घ्यायचे त्यासाठी पुन्हा नांगरट करावी लागायची त्यामुळे बर्‍याच प्रमाणात मंजिरी नष्ट व्हायची. मात्र अलीकडे पडीक शेतीचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. त्यामुळे मंजिरीचे क्षेत्र वाढत आहे. असे निसर्ग अभ्यासक प्रवीण कवळे यांनी सांगितले.

हा निसर्गाचा एक मनमोहक आविष्कार आहे. ठराविक कालावधीतच आणि विशिष्ट शेतांमध्येच जांभळी मंजिरी फुललेली दिसते. पर्यावरणाच्या साखळीमध्ये तिचेही काही योगदान आहे. जांभळ्या मंजिरीच्या प्रजातीचे संरक्षण होणे आवश्यक आहे. या हंगामात हमखास ही फुले पाहण्यासाठी या ठिकाणी येतो. शाळकरी मुलांनी देखील अशा ठिकाणी भेट देणे आवश्यक आहे.

राम मुंढे, निसर्ग अभ्यासक शिक्षक, पाटणूस-विळे
Exit mobile version