सगळ्याच आघाड्यांवर सरकार नापास

खा. सुब्रमण्यम स्वामी यांचा भाजपाला घराचा आहेर
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी सातत्याने केंद्र सरकारला घरचा आहेर देत आहेत. नुकताच त्यांनी ट्विटद्वारे सगळ्याच आघाड्यांवर केंद्र सरकार नापास झाल्याचे नोंदवत, पुन्हा एकदा भाजपाला घराचा आहेर दिला आहे.
खा. सुब्रमण्यम स्वामी आपल्या ट्विटरवरून नेहमीच मोदी सरकारच्या कामांवर टीका करत असतात. आता त्यांनी मोदी सरकारचे रिपोर्ट कार्ड ट्विट करत, देशाची अंतर्गत सुरक्षा, सीमा सुरक्षा, परराष्ट्र धोरण इत्यादी मुद्यांवर सरकार पास होऊ शकले नसल्याचे म्हटले आहे. तसेच या सगळ्यासाठी सुब्रमण्यम स्वामी जबाबदार आहे अशा शब्दात उपरोधिक टोलाही लगावला आहे.
अर्थव्यवस्थेत नापास, सीमा सुरक्षेत नापास, परराष्ट्र धोरणात अफगाणिस्तानमध्ये अपयश मिळाले. राष्ट्रीय सुरक्षेवरून पेगॅसस प्रकरण, अंतर्गत सुरक्षेत काश्मीरमध्ये निराशेचं वातावरण असल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. तसेच या सगळ्यासाठी जबाबदार कोण? सुब्रमण्यम स्वामी असे ट्विट स्वामींनी केले आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला याआधीही अनेकदा सवाल केले आहेत. यामुळे भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर टीकाही केली जाते. याआधी त्यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. त्यावरूनही उलटसुलट चर्चा झाली. यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दिल्ली दौर्‍यावर असलेल्या ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर त्यांना तृणमूलमध्ये प्रवेशाबद्दल प्रश्‍न विचारण्यात आला. त्यावर मी प्रत्येकवेळी सोबत आहे, असे म्हणत उत्तर देणे टाळले.
दरम्यान, ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर ट्विटरवर स्वामी म्हणाले की, मी जितक्या राजकीय नेत्यांना भेटलो किंवा ज्यांच्यासोबत काम केले, त्यामध्ये ममता बॅनर्जी, जेपी, मोराररजी देसाई, राजीव गांधी, चंद्रशेखर, पीव्ही नरसिंह राव यांचा समावेश आहे. या लोकांच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक नव्हता. भारतीय राजकारणातील हा दुर्मीळ गुण असल्याचेही सुब्रमण्यम स्वामी म्हणाले होते.

Exit mobile version