रायगडातील शेतकरी चिंतातुर
|पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी,ढगफुटी व महापुराने पेण गडब, सुधागड, अलिबाग महाड, पोलादपूर, माणगाव व अन्य तालुक्यात भात शेतीची जमीन पुराच्या पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेलेली आहे. त्यामुळे भातशेतीसह नाचणी, वरी, पालेभाजी या पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. इथली शेती पाण्याखाली बुडाली आहे. काही ठिकाणची पिके पूर्णतः झोपली आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास गळून पडल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
काही ठिकाणी पाषाणयुक्त जमिन झालेली आहे . तर काही ठिकाणी प्रवाहाच्या पाण्याने धुपुन गेलेली माती शेतीत दगड गोटयासह जाऊन उंचवटे तयार झालेले आहेत.आजघडीला भातशेती व अन्य पीक शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरकारने पुढाकार घेऊन नुकसानग्रस्त शेतकर्यांना जलद नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गडब् , कासु , आमटेम, खारेपाट व अन्य विभागातील नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केली आहे.
शेतकरी नारायण म्हात्रे यांनी सांगितले की आमच्या उदर निर्वाहाचे साधन शेती आहे, मात्र निसर्गा च्या लहरी पणामुळे शेती व्यवसाय धोक्यात आलाय, भातशेती पाण्याखाली गेली, पिक वाहून गेली, बांध बन्धिस्ती तुटली, शेतकर्यांवर आस्मानी संकट ओढवले, मायबाप सरकारने मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
भातशेती करणारा शेतकरी भातशेती का सोडत आहे याचा अभ्यास करण्यासाठी समिती संघटीत करावी. समितीमध्ये प्रगतशिल, अभ्यासु शेतकर्यांचा तज्ञांचा समावेश करुन शेतकर्यांच्या शेतीचा, शेतकर्यांचा राहणीमानाचा, व त्याला कशा प्रकारच्या मदतीची आवश्यकता आहे याचा अभ्यास होऊन समितीच्या शिफारशीनुसार भातपिक शेतकर्यांना सोई सुविधा व भात पिकाचा योग्य मोबदला देण्यात यावा. अशी मागणी रायगड जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरिचंद्र शिंदे यांनी केली आहे.
पेण तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे गडब, डोलवी, कांदळे, कांदळेपाडा, रोडा, निधवळी, गागोदे, करोटी, कासु, पाबळखोरे, खारेपाट, या भागांमध्ये शेतीसह घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे.
– स्वप्नाली डोईफोडे , तहसीलदार
ढगफुटी व महापुरात होत्याचे नव्हते झाले, कापनीला आलेली पीक उध्वस्त झाली, आमच्या जगण्याचे साधन हिरावून घेतले, आम्हाला पुन्हा उभे राहण्यासाठी सरकारने आवश्यक ती मद्त करावी अशी मागणी केली.
– तुकाराम पाटील, शेतकरी