नियोजनातील निधी खर्च करण्यास बांधकाम विभाग उदासीन
| अलिबाग | प्रमोद जाधव |
ग्रामीण आरोग्य सेवा मजबूत करण्याच्या बाता जिल्हा परिषद आरोग्य विभाग कायमच करीत आले आहे. मात्र, जिल्ह्यातील आरोग्य व उपकेंद्रांची दुरुस्ती करण्यास ही यंत्रणा अपयशी ठरल्याने केंद्रामध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नियोजनातून 133 कामांसाठी 14 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. फक्त 6 केंद्रांची दुरुस्ती करण्यास या यंत्रणेला यश आले आहे. उर्वरित 127 केंद्र दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती समोर आली आहे.
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाख 64 हजार असून, जिल्ह्यात दोन हजारांहून अधिक गावे, वाड्या आहेत. ग्रामीण भागाची आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी तसेच गावे, वाड्यांमध्ये राहणाऱ्या रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारित 55 आरोग्य केंद्र, 280 आरोग्य उपकेंद्र, सात जिल्हा परिषद दवाखाने आहेत. या संस्थांच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देण्याचे काम केले जाते. जिल्हा परिषद दवाखान्यांसह आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. नादुरुस्त असलेली केंद्र दुरुस्त करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधीची मागणी करण्यात आली होती. नियोजनातून 133 कामांसाठी 14 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. मात्र, यातील पाच टक्के निधीदेखील दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आला नसल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे. केंद्राची दुरुस्ती करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आली. 133 कामांपैकी फक्त 6 कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित 127 कामे अद्याप प्रलंबित आहेत.
पावसाळ्यात रामराज येथील उपकेंद्राचा स्लॅब कोसळून आरोग्य सेविका जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. कर्मचारी व रुग्ण जखमी झाल्यावरच केंद्राची दुरुस्ती करणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
आरोग्य केंद्राची तात्काळ दुरुस्ती करा: चित्रलेखा पाटील
रामराज येथील आरोग्य उपकेंद्राचा स्लॅब कोसळून एक आरोग्य सेविका जखमी झाली. त्यामुळे आरोग्य विभागात कर्मचारी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उपकेंद्राच्या दुरुस्तीसाठी गेल्यावर्षी सात लाख रुपयांचा निधी देण्यात आला. मात्र, त्याची दुरुस्ती करण्यास जिल्हा परिषद बांधकाम विभाग उदासीन ठरला आहे. आरोग्य केंद्राची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केली आहे.
नियोजनातून आरोग्य केंद्र, उपकेंद्र दुरुस्तीसाठी निधी मिळाला. जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. 133 कामांपैकी फक्त 6 केंद्रांची दुरुस्ती करण्यात आली आहे. उर्वरित केंद्राचे काम करणे शिल्लक राहिले आहे.
– डॉ. मनिषा विखे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद