| उरण | वार्ताहर |
उरण शहरात उन्हाची दाहकता कमालीची वाढली आहे. तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. या वाढत्या उष्णतेचा परिणाम पशु-पक्ष्यांसह मानवी जीवनावर होत आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे निवडणुकांचा प्रचार करताना, तसेच कामानिमित्त उन्हात फिरताना वाढत्या उष्णतेपासून काळजी घेणे आवश्यक बनले आहे.
गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पार 35 अंशापासून ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात सकाळी 10 वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात होते. 12 वाजता कडक ऊन पडते. दुपारी चार नंतर उन्हाच्या झळा कमी होतात. दरवर्षी शहरातील तापमान वाढताच उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, याविषयी प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येते. यंदा एप्रिलमध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून मे मध्ये त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. याच काळात लोकसभा निवडणुकीचा प्रचार होणार आहे. नेमकी ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने दरवर्षीप्रमाणे यंदाही उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. तसेच वाढत्या उष्णतेचा विचार करता, प्रचार करताना उमेदवारांनी त्यांच्यासह कार्यकर्त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. तर उमेदवारांनादेखील ऊन वाढण्याआधीच प्रचार आवरता घ्यावा लागणार आहे.