मासळी खवय्यांची चंगळ, भाव उतरले
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पाली सुधागडसह जिल्ह्यात सध्या थर्टी फस्ट व सलग लागून आलेल्या सुट्ट्यांनी पर्यटनस्थळे, सागरी किनारे बहरले आहे. त्यामुळे सारेच मासळीवर ताव मारत आहेत. मासळी खवय्यांची संख्या मोठी आहे, आता नियमित बाजारात ताजी मासळी उपलब्ध होत आहे. त्यामुळे मासळी खरेदीसाठी खवय्यांच्या उड्या पडत आहेत. जिल्ह्यात समुद्रात सध्या मोठ्या प्रमाणात मासळी सापडत आहे. त्यामुळे मासळीची आवक वाढली आहे. परिणामी मासळीचे भाव मागील महिन्याच्या तुलनेत 20 ते 30 टक्क्यांनी उतरले आहेत. 800 ते 1000 रुपये किलोने मिळणारे पापलेट, सुरमई व रावस आदी मासळी आता जेमतेम 600 ते 700 रुपये किलोने मिळत आहे. शिवाय विविध जाती व प्रकारचे मासे मिळत असल्याने खवय्यांची चंगळ झाली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात येणार्या पर्यटकांना देखील स्वस्तात मस्त मासळी मिळत आहे. त्यामुळे खवय्ये सध्या मासळीला सर्वाधिक पसंती देत आहेत. ओले बोंबील, मांदेली कोलंबी मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने त्यांचे भाव देखील खूप उतरले आहेत. मोठ्या विश्रांती नंतर मासळीची चांगली आवक येत आहे. खोल समुद्रातील व किनार्यावर मासेमारी जोरात सुरू आहे. यामुळे मासळीचे भाव उतरले आहेत.
- मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू झाल्याने मासळीची आवक वाढली आहे. त्यामुळे मागच्या महिन्यापेक्षा या महिन्यात मासळीचे दर कमी झाले आहेत. परिणामी किरकोळ बाजारात देखील दर कमी झाले आहेत. त्यामुळे खवय्ये खूप खुश आहेत. – गौरी मनोरे, मासळी विक्रेत्या, पाली
- सध्या ताजी मासळी मोठ्या प्रमाणात व स्वस्तात मिळत आहे. त्यामुळे मासे खरेदीवर अधिक भर आहे. – गिरीश काटकर, खवय्ये, पाली