| रायगड | प्रतिनिधी |
चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेता यंदा गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी-प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील 30 टक्के भाडेवाढ मागे घेण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) गेली 77 वर्षापेक्षा जास्त काळ महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासी सेवा देत आहे.
महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला फायदा-तोट्याचा विचार न करता दैनंदिन प्रवासाबरोबरच सण, यात्रा, उत्सव, लग्नकार्य यासाठी एसटी वेळेवर उपलब्ध करून दिली जाते. विशेषतः गणपती उत्सव, आषाढी यात्रा, होळीचा उत्सव यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार गट आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात बसेस उपलब्ध करून दिल्या जातात. यंदाही मुंबई व उपनगरातील चाकरमानी, प्रवाशांच्या मागणीनुसार तब्बल 5 हजार जादा एसटी बसेस गणपती उत्सवासाठी सोडण्याचे नियोजन एसटीने केले आहे.
प्रवासी केवळ एकेरी आरक्षण करीत असल्यामुळे परतीच्या प्रवासात एसटी बस मोकळ्या आणाव्या लागतात. त्याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका एसटीला बसतो. सण उत्सवासाठी राज्यभरातील इतर ठिकाणाहून बसेस एकत्रित करून प्रवाशांना उपलब्ध करून दिलेल्या असतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर बसेसची कमतरता निर्माण होते. हे लक्षात घेता हा तोटा आणखीन वाढला जाऊ शकतो. त्यामुळे एकेरी गट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटावर 30 टक्के भाडे वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने नाईलाजाने घेतला होता. परंतु, मुंबई व उपनगरातील मराठी चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेता, यंदा एकेरी गट आरक्षणावरील 30 भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे.
मागील वर्षी एसटी महामंडळाने गणपती उत्सवासाठी जाताना 4330 बसेस व परतीच्या प्रवासासाठी 1104 बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. एकेरी गट आरक्षणामुळे गणपती उत्सवाच्या काळामध्ये प्रवाशांना कोकणात त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचून रिकाम्या बसेस परत आणाव्या लागल्या. त्यांना परतीच्या प्रवासासाठी बसेस उपलब्ध करून देताना रिकाम्या बसेस राज्याच्या विविध भागातून कोकणात पाठवाव्या लागल्या. त्यामुळे इंधन खर्च, चालक वाहकांचे वेतन, आपत्कालीन भत्ता याचा प्रचंड मोठा आर्थिक बोजा एसटीवर पडला. यातून गणपती उत्सवाच्या काळामध्ये मिळालेल्या उत्पन्नामध्ये तब्बल 11 कोटी 68 लाख रुपयांचा तोटा महामंडळाला सहन करावा लागला. यंदा 5 हजार बसेस सोडण्याचे नियोजन आहे. या सर्व बसेस एकेरी गट आरक्षणासाठी आरक्षित झाल्यास हा तोटा 13 ते 16 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
गणपती उत्सव, मुंबईचे चाकरमानी आणि एसटी यांचे एक अतूट नाते आहे. कोकणी माणसाचे एसटीवर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे. त्यामुळे तोटा सहन करूनही एसटी गणपती उत्सव, दिवाळी, होळी यासारख्या उत्सव काळात चाकरमान्यांना नेहमीच सेवा देत आली आहे. यापुढेही देत राहील. चाकरमानी, प्रवाशांनी एसटीच्या आर्थिक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा. सध्या उत्सव काळामध्ये खासगी बसेस भरमसाट भाडेवाढ करतात. वाढत्या तिकीट दराच्या तुलनेमध्ये एसटीचे तिकीट दर हे अत्यंत कमी आहे. त्यामुळे भविष्यात एसटीने तत्कालीन दरवाढ केल्यास प्रवाशांनी त्याला सहकार्य करावे.
प्रताप सरनाईक,
परिवहन मंत्री तथा अध्यक्ष, एसटी महामंडळ







