4 जणांचा जिव बचावला; एकाचा मृत्यु
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
निसर्गराजीने सजलेल्या गणपतीपुळ्याच्या समुद्रकिनारी जलक्रीडा करणे, पर्यटकांच्या जीवावर बेतले आहे. समुद्रात पोहण्यास उतरलेल्या या पाच पर्यटकांपैकी चौघांना वाचवण्यात यश आले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. रत्नाकर कल्पनाथ सरोज (24) असे बुडून मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. तर गोलू समरजित सरोज (26), रोहित संजीवन वर्मा (23), कपिल रामशंकर वर्मा (28), मयूर सुधीर मिश्रा (28) यांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले. हे सर्व मूळेचे उत्तर प्रदेश राज्याचे रहिवासी असून सध्या खेड तालुक्यातील लोटे परिसरात वास्तव्यास आहेत.
शासकीय सुट्टी असल्यामुळे रविवारी सकाळी हे पाचजण लोटे येथून गणपतीपुळेत फिरण्यासाठी आले होते. देवदर्शन घेतल्यानंतर ते सर्व पोहण्यासाठी समुद्रात उरतले. ते पाचही जण पोहत पोहत समुद्राच्या खोल पाण्यात जाऊ लागले. किनार्यावरील काहींनी त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहण्याची सूचना केली होती.
थोड्याच वेळात ते बुडू लागले. हा प्रकार समुद्रात पर्यटकांची सैर घडवून आणणार्या बोटिंग व्यावसायिकांच्या आणि जीवरक्षकांच्या लक्षात आला. त्यांनी बुडणार्या पर्यटकांजवळ जाऊन त्यांना बाहेर काढले.