ई-रिक्षासाठी पालिकेत निघाली सोडत
| माथेरान | वार्ताहर |
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने 20 ई-रिक्षा प्रायोगिक तत्वावर चालविण्याचे असल्याने परवाना धारक हातरीक्षा चालकांना देणार, असल्याने त्याची सोडत माथेरान नगरपालिका कार्यालयात घेण्यात आली. 24 अर्ज नगरपालिकेत प्राप्त झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाने ही सोडत माथेरान नगरपालिकेत घेण्यात आली. यामध्ये 20 हातरीक्षा चालकांचे नशीब चमकले आहे.
सनियंत्रण समितीचे सचिव हे रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असून त्यांच्याकडून आलेल्या आदेशाने सोमवार (दि.27) रोजी सायंकाळी 5:30 वाजता ही सोडत घेण्यात आली. दरम्यान, 24 अर्ज दाखल झाले, असून त्यावर काही आक्षेप असल्यास बोलावे असे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सांगितले. पण मुख्य विषयासंदर्भातच बोलावे त्यावर कोणाचाही आक्षेप नसल्याने सोडतचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, ऋजुता प्रधान यांच्या एक लायसनवर दोन रिक्षा देता येत नसल्याने त्यांचा एक अर्ज बाद करण्यात आला. एकूण 23 अर्जदारांची सोडत घेण्यात आली. अर्णव शेखर जाधव या शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते पारदर्शकपणे सोडत काढण्यात आली. यामध्ये बंद बरणी मधून एकएक चिठ्ठी काढत एकूण वीस चिठया बाहेर काढण्यात आल्या. आणि शेवटच्या राहिलेल्या तीन चिठया बरणीतच ठेवण्यात आल्या नंतर बाहेर काढलेल्या चिठया एकएक करून खोलून त्यांची नावे पुकारण्यात आली. अशा एकूण वीस हातरीक्षा चालकांच्या नावाच्या चिठया पारदर्शकपणे काढण्यात आल्या. त्या सर्वानुमते मंजूर देखील करण्यात आल्या. याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला दिला जाईल याबाबत कोणाला काही तक्रार असेल तर त्यांनी मंगळवार पर्यंत लेखी स्वरूपात द्याव्यात त्या वरिष्ठांकडे सादर केल्या जातील. याप्रसंगी हातरीक्षा चालकमालक संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार, सचिव सुनील शिंदे, सर्व हातरीक्षा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते तर नगरपालिकेचे लिपिक सदानंद इंगळे, लेखापाल अंकुश इचके यांनी पारदर्शक काम पाहिले.आता लवकरात लवकर विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, दिव्यांग व पर्यटकांना ई- रिक्षा सेवेचा लाभ मिळणार व स्थानिक भूमिपुत्रांना हक्काचा रोजगार मिळणार असून येथील ठेकेदारी हद्दपार होणार असे संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल यांनी सांगितले.