। महाड । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावर महाड जवळ सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला सावित्री नदीवरील जुना पूल तोडण्याचे काम मंगळवार पासून सुरू झाले. पूर परिस्थिती मध्ये सावित्री नदीवरील हा पूल पाण्याचा प्रवाहला अडथळा निर्माण करत असल्याचा निर्वाळा तज्ञांनी दिल्याने आता हा जुना पूल पाडला जाणार आहे.महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम होण्यापूर्वी महाड जवळील राजेवाडी येथे सावित्री नदीवर दुर्घटनाग्रस्त झालेला ब्रिटिशकालीन पूल आणि सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी बांधलेला आणखी एक पूल असे दोन पूल होते. सावित्री चा ब्रिटिशकालीन पूल कोसळल्यानंतर या ठिकाणी नवीन पूल काही महिन्यातच बांधण्यात आला. तर मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणा मध्ये आणखी एक नवीन पूल सावित्री नदीवर बांधण्यात आला. या दोन नवीन पुलांच्या मध्ये सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला आणखी एक पूल नदीवर आहे. गतवर्षी 22 जुलैला आलेल्या महापुरामुळे सावित्री नदीवरील हा जुना पूल पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करत असल्याने महाड एमआयडीसी, नांगलवाडी फाटा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साठले आणि कंपन्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. यानंतर महाड पूर निवारण समिती व महाड उत्पादक संघाने हा पूल सावित्री नदीतील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करत असल्याने तोडून टाकावा अशी मागणी केली होती. या बाबत प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी यांच्यासोबत पूर निवारण समितीची व उत्पादक संघाची बैठकही झाली .यामध्ये याबाबत तज्ज्ञ समितीचा अहवाल मागवण्याचे ठरले होते .त्यानुसार तज्ञ समितीने हा पूल पाडण्याची शिफारस केल्याने काल पासून सावित्री नदीवरील पंचवीस वर्षांपूर्वीचा हा जुना पूल तोडून टाकण्याचे काम करण्यात येत आहे. हा पूल पंचवीस वर्षापूर्वी बांधण्यात आला असल्याने त्याचे बांधकामही सुस्थितीमध्ये होते.