चांगल्या रस्त्यापासून ग्रामस्थ वंचित
पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची वणवण
। माणगाव । प्रतिनिधी ।
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होऊन गेली असतानाही माणगाव तालुक्यातील खर्डी खुर्द, नेराव, सुतारवाडी ते उंडरेवाडीत विकासाचा सूर्य उगवलाच नाही, त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही ग्रामस्थांचा विकासाचा मार्ग खडतरच राहिला आहे. रायगड जिल्ह्यात या गावाला दोन तालुके, तीन ग्रामपंचायती लाभल्या असून, ही गावे विकासापासून उपेक्षित राहिली आहेत. याकडे लोकप्रतिनिधी व शासनांनी अक्षम्य दुर्लक्ष चालवले आहे. त्यामुळे उंडरे वाडीत स्वातंत्र्याच्या सूर्याची किरणे विकसाअभावी तोकडीच पडली आहेत. या गावांना 75 वर्षांत अजून साधा रस्ताही मिळाला नाही. दुरून डबक्यातील पाणी आणून महिलांच्या डोळ्यात अश्रू आजही उभे आहेत. त्यामुळे खरच आम्हाला स्वातंत्र्य मिळाले का? असा प्रांजळ सवाल येथील ग्रामस्थांतून बोलताना उपस्थित होत आहे.
रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि महाड तालुक्यातील हद्दीवरील या गावाची ही करुण कहाणी आहे. जिल्हा एक, तालुके दोन, ग्रामपंचायती तीन असूनही या गावापर्यंत विकासाची किरणे पोहोचलीच नाहीत. माणगाव तालुक्यातील कवीळवहाळ, पळसगाव या दोन ग्रामपंचायती तर महाड तालुक्यातील नेराव ग्रामपंचायत हद्दीत उंडरेवाडी, उंबरी व पळसगाव धनगरवाडी येत असून, उंबरी व धनगरवाडी येथील काही घरे महाड तालुक्याच्या हद्दीत येतात. तीनही गावांची मिळून सुमारे सहाशे वस्ती आहे. गावापासून काही अंतरावर असणार्या तलावातून महिला हंड्याने पाणी आणतात. त्यामुळे पिढ्यान्पिढ्याचे चालत आलेले पाण्याचे ओझे आजही कायम डोक्यावर आहे. त्यामुळे महिलांच्या डोळ्यात अश्रू उभारले आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या मूलभूत गरजांची आवश्यकता आहे. त्याच अद्यापही पोहोचलेल्या नाहीत. माणगाव तालुक्यातील पळसगाव खर्डीपासून सुमारे 5 कि.मी. अंतराचा रस्ता या गावांच्या विकासासाठी अपेक्षित आहे. तोही रस्ता नसल्यामुळे या गावांच्या विकासाचा मार्गच खडतर बनला आहे.
खर्डी खुर्द, नेराव, सुतारवाडी ते उंडरेवाडी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, अद्याप या रस्त्याची समस्या सुटली नसल्याने येथील ग्रामस्थांचे पुरते हाल होत आहेत. हा रस्ता करण्याबाबत रायगड किल्ला प्राधिकरण समितीचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे, खा. सुनील तटकरे, आ. भरत गोगावले यांना निवेदने दिली होती. – पंकज तांबे