ठेकेदाराची काम करण्यास टाळाटाळ
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीमधील मुख्य रस्त्याच्या कामासाठी पाईप आणण्यात आले आहेत. मात्र, रस्त्याचे काम करणार्या ठेकेदाराकडून कोणतेही काम करण्यात आले नाही आणि त्यामुळे या पावसाळ्यात येथील रस्त्याची शक्यता कमी असून, पावसाळ्यात खड्डेमय रस्त्याने प्रवास करण्याची वेळ आली आहे.
नांदगाव गावातून बलीवरे गावाकडे जाणार्या रस्त्याचे काम करण्यासाठी निधी मंजूर आहे. त्यासाठी तेथे रस्त्यात नवीन पाईप मोरी बनवण्यासाठी सिंमेट पाईपदेखील आणून टाकण्यात आले आहेत. मात्र, रस्त्याचे काम सध्या खड्डेमय असून, रस्त्याची दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्याची गरज आहे. त्यासाठी बांधकाम खात्याकडून रस्त्यावरील कामे केली जाणार आहेत. त्यात नांदगावच्या पुढे न्हाणी नदीच्या अलीकडे जुन्या मोरीचे पाईप काढून नवीन पाईप टाकण्यासाठी पाईप आणण्यात आले आहेत. मात्र, पावसाळा सुरू झाल्याने ते पाईप तसेच शेतात पडून आहेत. संबंधित ठेकेदाराला सूचना करण्याची मागणी स्थानिक शेतकरी करीत आहेत. ज्या शेतात ते पाईप टाकण्यात आले आहेत, त्या शेतजमिनीचे मालक यांनादेखील शेती करण्यात अडचणी येणार आहेत. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती आणि नूतनीकरण ही कामे होतील की नाही, अशी स्थिती निर्मण झाली आहेत.