जिल्हा परिषदांमधील पदांची भरती केली जावी : आ. जयंत पाटील

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
राज्यातील जिल्हा परिषदेमधील विविध सवंर्गातील पदांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जावी, अशी मागणी आ. जयंत पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी सरकारकडे केली आहे. शासनाने जिल्हा परिषदामध्ये रिक्त असलेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया सन 2015 मध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात येऊनही जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया, पोलीस भरती, अंगणवाडी सेविका भरती, नगरपालिका व महानगरपालिका भरती जाहीर केलेली असतानाही सर्व भरतीप्रक्रिया अद्यापही प्रलंबित असून, नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत महाराष्ट्र विकास सेवा गट ‘अ’ व गट ‘ब’ तथा अन्य विभागांतर्गत असलेल्या गट ब ची रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नागपूर यांनी प्रस्ताव संबंधित विभागाला सादर केलेला आहे. सदर प्रस्तावात जि.प. अंतर्गत महाराष्ट्र विकास सेवा गट ‘अ’ व गट ‘ब’ची 9 पदे, मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत गट ब 7 पदे, बांधकाम विभागांतर्गत गट ‘ब’ 2 पदे, आरोग्य विभागांतर्गत गट ‘ब’चे 4 पदे, वित्त विभागांतर्गत गट अ (कनिष्ठ) 1 पद, शिक्षण विभागांतर्गत गट मवा 16 पदे रिक्त असल्याने जि.प. प्रशासन व पर्यायाने विकासकामावर परिणाम होत असून, कामे प्रलंबित असल्याचे या सदस्यांचे म्हणणे आहे.

ग्र्रामविकासांतर्गत जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील जवळपास 13,000 जागांकरिता सन 2018 मध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, भरती प्रक्रियेकरिता सुमारे 19.5 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. आरक्षणाच्या समस्येमुळे महा ई पोर्टल रद्द केल्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली असल्याचे या सदस्यांचे म्हणणे आहे. या प्रश्‍नांवर मंत्री यांनी रिक्त पदे असल्याचे मान्य केले आहे. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारितील राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क मधील 18 संवर्गातील एकूण 13,514 इतकी रिक्त पदे ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी शासनाच्या महाआयटी मार्फत माहे मार्च, 2019 मध्ये अर्ज मागविण्यात आले असता एकूण 12,72,319 अर्ज प्राप्त झाले असून, परीक्षा शुल्कापोटी शासनाकडे रुपये 25,00,87,941/- प्राप्त झाले आहेत. सदर परीक्षा महापरीक्षा पोर्टल रद्द झाल्यामुळे होऊ शकली नाही.

ग्रामविकास विभागाच्या अखत्यारितील जिल्हा परिषदे अंतर्गत गट क मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गाच्या पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम विभागाच्या 21 ऑक्टोबर, 2022 व दिनांक 15 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आला होता. तथापि, सामान्य प्रशासन विभागाच्या 21 नोव्हेंबर, 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशानुसार परीक्षा टीसीएस/आ.बी.पी.एस. या कंपन्यांद्वारे ऑनलाईन पद्धतीने घ्यावयाच्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद स्तरावर आय.बी.पी.एस. या कंपनीसोबत सामंजस्य करार अंतिम करण्याची कार्यवाही सुरू आहे. लवकरच जिल्हा परिषद स्तरावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे महाजन यांनी नमूद केलेले आहे.

21 ऑक्टोबर, 2022 च्या जाहिरातीनुसार ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेले/भरलेले आहेत व सध्या वयाधिक्य झाले असल्याने ते परीक्षेस बसण्यास अपात्र होऊ नये, याकरिता अशा उमेदवारांचे अर्ज स्वीकरून पुढील फक्त एका परीक्षेस बसण्याकरिता अशा उमेदवारांना वयोमर्यादित सूट देण्यात आली असल्याचे त्यांनी सूचित केले.

Exit mobile version