वणव्यात वनसंपत्तीची मोठी हानी; गस्त वाढविण्याबाबतीत वनविभागाचे दुर्लक्ष
| सोगाव | अब्दुल सोगावकर |
अलिबाग तालुक्यातील पर्यटनदृष्ट्या असलेल्या रामधरणेश्वरच्या डोंगरावर लागलेल्या वणव्यात कोट्यवधींची वनसंपदा जळून नष्ट झाली आहे. दरम्यान, या वनक्षेत्रात वणवा लागल्याचे समजताच सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या शर्थीने ही आग आटोक्यात आणली. मात्र, दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी पुन्हा वणवा लागून उरलासुरला डोंगर देखील जळून खाक झाला आहे. याबाबत वनक्षेत्रात गस्त वाढविण्याबाबतीत वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरण प्रेमींनी यावेळी नाराजी व्यक्त केली.

अलिबाग तालुक्यातील रामधरणेश्वर डोंगरावर रविवारी (दि.14) दुपारच्या वेळी वणवा लागण्याची घटना घडली. आग लागल्याचे समजताच सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून वणवा लागल्याची माहिती दिली. या डोंगरावर मोठ्या प्रमाणात आदिवासी वस्ती आहे. त्यामुळे त्यानंतर वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत आणि काही विपरीत घडण्याआधी सचिन घाडी यांनी आपल्या मित्रमंडळीसह वणव्याच्या ठिकाणी जाऊन मोठ्या मेहनतीने आग आटोक्यात आणली. तसेच, रामधरणेश्वर डोंगराच्या वरिल बाजुस पंचक्रोशीतील गायी, बैल, म्हशी, बकऱ्या आदी पाळीव जनावरे मोठ्या प्रमाणात चरत असतात. या वणव्यामुळे त्यांच्या चाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर याठिकाणी औषधी वनस्पती, रानटी मेवा, निरनिराळ्या प्रकारच्या पक्ष्यांची अंडी व त्यांचा निवारा असल्याने जळून त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांच्यासह नितेश ठकरूळ, संदेश वाघमारे, गणेश पवार, रामजी पवार, अनिल पिंगळा, मोतीराम पारधी, सागर लेंडे तसेच वनविभागाचे वनरक्षक आकांक्षा खांडवे, कावेरी दराडे, राम टाकरस, निखिल दणाने हे आग विझविण्यासाठी आल्यामुळे त्या सर्वांचे पर्यावरणप्रेमींनी आभार मानले.
वणव्यामुळे भोगावे लागणारे परिणाम
वणवा लागल्यामुळे वातावरणात बदल होऊन उष्णता वाढते. वनक्षेत्रात असणाऱ्या वन्यजीवांच्या पारंपरिक खाद्याचे नुकसान होते. परिणामी वन्य प्राणी खाद्य नसल्यामुळे डोंगर पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये येऊन शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना व मानवजातीला धोका निर्माण करतात. डोंगरावर असणारे जीवजंतू, सरपटणारे प्राणी, बिबटे, माकडे, डुकरे व इतर प्राणी मानवी वस्तीत येऊन नुकसान करण्याची देखील शक्यता वाढते. यांसारखे वणवा लागल्यामुळे अनेक धोके संभवतात.
वनविभागाने आग लावणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी. या पुढील काळात वनविभागाच्या क्षेत्रात वनकर्मचारी यांची गस्त वाढवत पर्यावरणाची हानी होऊच नये यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. या वणव्यात गुरांचा चारा नष्ट झाल्याने ते डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात घुसतात आणि शेतीची नासधूस करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. तसेच, आग विझवण्याची यंत्रसामग्री आणि पुरेसे मनुष्यबळ वनविभागाकडे नसल्याचे दरवेळी निदर्शनास येत आहे. त्यामुळे त्यांनी याची काळजी घ्यावी.
-सचिन घाडी,
सामाजिक कार्यकर्ते







