छत्रपती संभाजीराजांचे स्पष्टीकरण
| महाड | प्रतिनिधी |
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमण हटवल्यानंतर रायगड किल्ल्यावरील पुरातन धनगर वाड्यांवरील घरे खाली करण्याबाबत पुरातत्व विभाग व वन विभागाने तेथील रहिवाशांना दिलेल्या नोटीसीबाबत रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे यांना विचारले असता त्या ठिकाणी असणारे अनधिकृत बांधकाम असेल ते निघाले पाहिजे, त्याचबरोबर मी धनगर समाजाच्या पाठीशी ठामपणे आहे; परंतु रायगड रोप-वेने केलेल्या बांधकामाबाबत विचारले असता हे रायगड प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली नसून, याबाबत पुरातत्त्व खात्यालाच विचारा, असे छत्रपती संभाजी राजे यांनी सांगितले.
रायगड किल्ल्यावरील प्राधिकरणामार्फत चालू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे जात होते. मात्र, मोठ्या प्रमाणावर होत असलेली पर्जन्यवृष्टीमुळे त्यांनी रायगडवर जाणे रद्द केले व त्याबाबत त्यांनी महाड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी गप्पा मारल्या. दरम्यान, रायगड रोपेच्या अतिक्रमणबाबत त्यांना विचारले असता, हा विषय पुरातत्त्व खात्याला पूर्णपणे माहिती आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांना मी सांगितलेले आहे, पुरातत्व खात्याला पूर्णपणे माहिती आहे, मी रायगड प्राधिकरणाचा अध्यक्ष म्हणून तिथे कोणतेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही, तसेच मी कोणतीही परवानगी दिलेली नाही.
रायगडवर रोपवेने केलेले अतिक्रमण रायगड प्राधिकरणाला चालत नाही, व्यक्तिगत संभाजी छत्रपतींना पण चालत नाही, हा प्रश्न माझा मुख्यमंत्र्यांना पण आहे, आणि पुरातत्त्व खात्याला पण आहे. तुम्ही आम्हाला नियम लावता हे करायचे नाही, ते करायचं नाही, दगड हलवायचा नाही. तुम्ही हा प्रश्न मुख्यमंत्री येतात, सांस्कृतिक मंत्री येतात, त्यांना विचारा, पुरातत्त्व खात्याला विचारा, असे छत्रपती संभाजी राजे यांनी सांगितले.
एकंदरीत, रायगड किल्ल्यावरील रायगड रोपवेने केलेल्या अतिक्रमणाला पुरातत्व विभाग पाठीशी घालत असल्याचे यातून निष्पन्न होत आहे. आता छत्रपती संभाजी राजांच्या भूमिकेनंतर पुरातत्व विभाग काय भूमिका घेते, याकडे किल्ल्यावरील रहिवासी असणाऱ्या धनगर समाजासहित रायगड किल्ला परिसरातील आम जनता या पुरातत्त्व खात्याच्या भूमिकेकडे डोळे लावून बसले आहे.







