जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास; प्रवासी, नागरिक त्रस्त
। कोलाड । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्ग 66 वरील आंबेवाडी बाजारपेठेतील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि चिखलामुळे वाहन चालकांसह प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशी वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्ग 66 वरील चौपदरी करणाच्या रस्त्याच्या कामाला गेली 12 वर्षापूर्वी सुरुवात करण्यात आली असून अद्याप हे काम रखडलेल्या अवस्थेत आहे. या महामार्गावरील आंबेवाडी बाजारपेठेतील उड्डाण पुलाचे काम पावसाळा सुरु होण्याच्या एक महिना अगोदर सुरु केले. परंतु हे काम सुरु करण्याच्या अगोदर दोन्ही बाजूला असणार्या बायपास रस्त्याचे काम सिमेंट काँक्रीटने करणे गरजेचे होते. परंतु, असे काही झाले नाही. हे काम न करता उड्डाण पुलाचे काम सुरु केले. या मार्गांवरून जाणारी वाहतूक दोन्ही बाजूच्या बायपास रस्त्यावरून वळविण्यात आली. गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या पाऊसामुळे या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.
या महामार्गांवरील रात्री वाहतूक कमी झाल्यानंतर सिमेंट मिश्रित खडीने खड्डे भरण्याचे काम केले जात आहेत. परंतु जोरदार पावसामुळे खडी एकीकडे सिमेंट एकीकडे. यामुळे या रस्त्याला चिखल व खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हा चिखल येणार्या-जाणार्या वाहनांमुळे नागरिकांच्या अंगावर उडत आहे, तर व्यावसायिकांच्या दुकानात उडून विविध वस्तू खराब होत आहेत. याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या नवीन कामासाठी केंद्र सरकार व राज्यसरकार यांच्याकडून एकूण 6000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, तर दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल 192 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा खर्च चिखलात गेला असल्याची परिस्थिती पहावयास मिळत आहे.
आंबेवाडी नाक्यावरील बाजारपेठेचे मध्यवर्ती ठिकाण असून येथे मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी तसेच मुरुड, अलिबाग अशा चारही बाजूकडील प्रवाशी ये-जा करीत असतात. त्यामुळे येथे प्रवासी वर्गाची मोठया प्रमाणात वर्दळ सुरु असते. परंतु या रस्त्याला पडलेले खड्डे व चिखल पाहून आजवरचे लोकप्रतिनिधी या समस्या सोडविण्यासाठी अपयशी ठरले आहेत. हे एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येत असून आता तरी ‘उघडा डोळे बघा निट’, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे.