ओले काजूगराचा हंगाम सरतोय

किंमती वाढल्या; खवय्यांची खरेदीची लगबग

| पाली/बेणसे | वार्ताहर |

ओले काजूगराचा हंगाम आता सरत चालला आहे. त्यामुळे काजूगर अल्प प्रमाणात विक्रीसाठी येत आहेत. शिवाय मागील महिन्याच्या तुलनेत किंमती देखील वाढल्या आहेत. 15 दिवसांपूर्वी 100 ते 150 रुपये शेकड्याने मिळणारे काजूगर आता 200 ते 250 रुपये शेकड्याने भेटत आहेत. किंमत वधारली असली तरी हंगाम सरत चालला असल्याने पाली सुधागड सह जिल्ह्यात काजूगर खरेदीसाठी खवय्ये लगबग करत आहेत.

अवकाळी पाऊस व खराब हवामान यामुळे यंदा काजू व आंबा पिकावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. उत्पादन सुद्धा घटले आहे. आदिवासी महिला हा रान मेवा विकायला घेवून येतात. सध्या भाव चांगला मिळत असल्याने आनंदी आहेत. माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा आदी ठिकाणी काजूगर शेकड्याने मिळतात. तर पाली, रोहा, पेण आदी ठिकाणी अर्धे काजूगर वाट्यावर मिळतात. 10 रुपयांनी मिळणार वाटा आता 20 रुपयाने मिळत आहे. भाव जास्त असला तरी खवय्ये मात्र चढ्या भावाने देखिल काजूगर खरेदी करत आहेत. सुधागड येथील काजूगर विक्रेती महिला ताई वाघमारे यांनी सांगितले की मे महिन्यापर्यंत ओल्या काजुगराचा हंगाम सुरु असतो मात्र काजूचे फळ तयार झाल्यावर ओले काजुगर मिळत नाहीत. काजूगर विकून आदिवासींच्या हाती चांगले पैसे देखील मिळतात.

अनोखी शक्कल
फळ धारणा होण्याआधी आलेल्या बी मधून काजूगर काढला जातो. त्यानंतर फळ मोठे झाल्यावर बी परिपक्व होते. आणि ओल्या काजुगराचा हंगाम संपतो. मात्र काहीजण या परिपक्व बिया पाण्याच्या मोठ्या पिंपात भिजवून ठेवतात व त्यातील गर काढून ओले काजूगर असल्याचे सांगून विकतात. ओले काजूगर आणि परिपक्व झालेल्या काजूच्या बियांमधील गराच्या चवीत खूप फरक असतो.

काजूगराचे चविष्ट पदार्थ
चविष्ट ओले काजूगर वेगवेगळ्या प्रकारे खाल्या जातात. कजुगराचा रस्सा किंवा सुकी भाजी करुन खाल्ली जाते. पुलाव व बिर्याणी देखील केली जाते. तसेच मटन, मच्छी, व सुक्या मासळी मध्ये टाकुन सुद्धा काजूगर खाल्ले जातात. असे हे काजूगर जेवणाची लज्जत वाढवितात.

काढण्यासाठी मेहनत
दुर्गम, डोंगराळ भागात आणि जंगलात काजुच्या बिया काढण्यासाठी जावे लागते. आदिवासी बांधव अनवाणी उन्हातान्हात बिया काढण्यासाठी जातात. या बियांना मोठ्या प्रमाणात चिक असतो. आदिवासी महिला व बांधव या बियांमधून काजूगर काढतांना हातात मोजे घालत नाही किंवा कोणतीही सुरक्षितता घेत नाही. त्यामुळे त्यांचे हात व बोटे चिकामुळे पुर्णपणे खराब होतात. काही जण राख लावतात पण त्याने काही फरक पडत नाही. शासनाकडून त्यांना हातमोजे देणे तसेच सहाय्य करणे गरजेचे आहे. असे सुधागडातील आदिवासी समाज नेते रमेश पवार यांनी सांगितले.

Exit mobile version