स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
अनेक रस्त्यांच्या साईटपट्टीवरच कचरा टाकला जात आहे. यामुळे रस्त्याची साईटपट्टी कचराकुंडी बनण्याचे संकट वाढले आहे. प्रवाशांसह स्थानिकांना नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य धोक्यात येण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाख 64 हजारहून अधिक आहे. दोन हजारहून अधिक गावे, वाड्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात 810 ग्रामपंचायती आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहवे, येथील रुग्णांना तात्काळ रुग्णसेवा मिळावी यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारित 54 प्राथमिक आरोग्य केंद्र व 288 उपकेंद्र आहेत. असे असले तरी कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्राम पातळीवर घन कचरा व्यवस्थापन नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा कचरा टाकला जात आहे.
यामुळे अलिबाग-रोहा तसेच अलिबाग-पेण व अलिबाग-मुरूड या मार्गासह अनेक रस्त्यांची साईट पट्टी कचराकुंडीचा अड्डा बनू लागली आहे. रस्त्याच्या बाजूला कचरा पडल्याने त्याचा नाहक त्रास प्रवासी व स्थानिकांना होत आहे. त्यांना नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. तसेच, या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर वाढू लागल्याने अपघात होण्याची तसेच कुत्र्यांचा हल्ला होण्याची भिती वाढली आहे. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाकडून गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
जिल्हा परिषदेची योजना बारगळी
कचर्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील कचर्याचे व्यवस्थानपन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने ग्रामपंचायत स्तरावर कंपोस्ट पीटची संकल्पना राबविली होती. ग्रामपंचायतीने पुढाकार घेत अनेक ठिकाणी कंपोस्ट पीट उभारले होते. या कंपोस्ट पीटमध्ये कचरा टाकण्याचे काम करण्यात आले. परंतु, या कंपोस्ट पीटवर कचर्याचा डोंगर उभा राहिला असून काही कंपोस्ट पीट रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तोडण्यात आले आहेत. यामुळे कंपोस्ट पीटची योजनादेखील बारगळी असल्याचे चित्र आहे.