| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतमधील आषाणे गावामध्ये नळाचे पाणी नसल्याने दरवर्षी या गावात उन्हाळा सुरु झाली कि पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरु होते. त्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी उमरोली ग्रामपंचायतमध्ये जाऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. दरम्यान कर्जत पंचायत समिती कडून ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी पाण्याचा ट्रँकर पाठवून देण्यात आला आहे.
आषाणे ग्रामपंचायतमधील ग्रामपंचायत सदस्या प्रमिला ठाणगे यांनी गावातील भीषण पाण्याची समस्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतमध्ये असंख्य महिलांसह जाऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. त्यावेळी सरपंच ठमी सांबरी आणि ग्रामविकास अधिकारी रामलाल चौधरी यांनी आपल्या गावातील समस्येबाबत तात्काळ कर्जत पंचायत समितीला कळविले जाईल असे जाहीर केले होते. त्यानंतर कर्जत पंचायत समितीमधील पथकाने तात्काळ आषाणे येथे भेट देऊन तेथील कोरड्या पडलेल्या विहिरींची पाहणी केली. तसेच गावातील खासगी बोअरवेल यांची देखील माहिती घेतली.
त्यानंतर कर्जत पंचायत समितीकडून आषाणे गावासाठी पाण्याचा ट्रँकर पाठवून देण्यात आला आहे. येथील विहिरीमध्ये पाण्याचा ट्रँकर टाकण्यात आला. त्यावेळी स्थानिक ग्रासमथ आणि कार्यकर्ते मनोज ठाणगे हे उपस्थित होते. आषाणे गावातील आणि आदिवासी वाडीमधील मथुरा धुंदा श्रीखंडे, ताई परशुराम श्रीखंडे, गीता गणेश श्रीखंडे, दीपा नितीन ठाणगे, रूपा भरत ठाणगे, गौरी रोशन जाधव, विमल जांभुळकर, अनिता अशोक ठाणगे आदी महिलांनी ट्रँकरचे पाणी नियोजन करून वाचविण्याचे आश्वासन दिले आहे.