रायगडातील विद्यार्थ्यांची तृष्णा भागणार

शाळा, अंगणवाड्यांना नळाद्वारे पाणीपुरवठा
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्यांची पाणी समस्या निकाली निघाली असून, सर्व अंगणवाड्यांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याच नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 3 हजार 158 शाळांपैकी 3 हजार 116 तर 3 हजार 53 अंगणवाड्यांपैकी 3 हजार 2 अंगणवाड्यांमध्ये नळ कनेक्शन जोडण्यात येऊन नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. तर उर्वरित शाळा व अंगणवाड्यांना जल जीवन मिशन अंतर्गत स्व. मीनाताई ठाकरे योजनेतून पाऊस पाणी संकलनाद्वारे साठवण टाक्या उभारुन पाणी पुरवठा करणे प्रस्तावित असून, सदर कामे प्रगतीपथावर आहेत.

जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी नळ कनेक्शन जोडण्याची मोहीम रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने जलजीवन योजनेअंतर्गत हाती घेतली आहे. रायगड जिल्ह्यात 3 हजार 158 शाळा असून, 14 मार्चपर्यंत 98.67 टक्के म्हणजे 3 हजार 116 शाळांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर 3 हजार 53 अंगणवाड्या असून, आत्तापर्यंत 98.33 टक्के म्हणजे 3 हजार 2 अंगणवाड्यांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. उर्वरित 42 शाळा व 42 अंगणवाड्यांना त्वरित नळ कनेक्शन जोडण्याचे काम पूर्ण करावे असे आवाहन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

शाळा व अंगणवाडी इमारतींना नळ कनेक्शन जोडण्याची मोहीम जलाजीवन योजनेतंर्गत हाती घेण्यात आली आहे. 98 टक्क्यांहून अधिक शाळा व अंगणवाड्यांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. उर्वरित नळ कनेक्शन देण्याची कार्यवाही सुरू असून, पाऊस पाणी संकलनाद्वारे साठवण टाक्या उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचा आढावा घेण्यात येत आहे. पुढील काही दिवसात जिल्ह्यातील 100 टक्के शाळा व अंगणवाड्यांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येईल. – डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड.

Exit mobile version