। दापोली । प्रतिनिधी ।
तालुक्यातील प्रसिद्ध कर्दे समुद्रकिनारी गुरुवारी (दि.11) संध्याकाळी साडेचारच्या सुमारास एक थार गाडी समुद्राच्या पाण्यातून भरधाव वेगाने चालवल्यामुळे नियंत्रण सुटून उलटली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले. गाडी जेसीबीच्या व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, वारंवार सूचना करूनही पर्यटक समुद्राच्या किनाऱ्यावर गाड्या भरधाव वेगाने चालवत असतात. त्यामुळे अशा अपघातांची पुनरावृत्ती होत आहे. आजच्या घटनेमुळे किनाऱ्यावर उपस्थित नागरिकांमध्ये मोठा संताप पसरला.
समुद्रकिनाऱ्यावर गाड्या घेऊन जाण्यावर तातडीने कडक बंदी घालावी. नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करावी. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा पर्यटकांच्या बेफिकीर वागणुकीमुळे स्थानिकांच्या सुरक्षिततेचा आणि समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्याला धोका निर्माण होत असल्याबाबत स्थानिकांनी प्रशासनाने कटाक्ष ठेवण्याची मागणी केली आहे.







