| सुकेळी | वार्ताहर |
कोकणातील महत्त्वाचा अशा मानल्या जाणाऱ्या होळीच्या सणानिमित्त अनेक कोकणवासीय कोकणात आपल्या गावी जात असतात. मुंबई -गोवा महामार्गावरील सुकेळी येथील जिंदाल कंपनीच्या समोर बुधवारी (दि.12)रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास बर्निंग कारचा थरार पहावयास मिळाला. चालत्या कारने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण कार जळुन खाक झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, वॅग्नर कार चालक देविदास अनंत डोंगरे, रा.अंधेरी हे आपल्या ताब्यातील कार घेऊन सोबत शुभम संतोष तेली, रा.पनवेल व रोहीत तेली रा. कल्याण यांच्यासह होळी सणानिमित्त आपल्या कणकवली या गावी जात असताना नागोठण्याच्या पुढे सुकेळी येथील जिंदाल कंपनीच्या समोर कार आली असता, अचानक इंजिनमधून धुर आल्याचे चालक देविदास डोंगरे यांच्या लक्षात येताच त्यांनी रस्त्याच्या डाव्या बाजूला रस्त्यावर कार उभी केली. कारमधील तिघांनीही जेवढं सामान हातात भेटेल तेवढे घेऊन कारच्या बाहेर पडले. काही क्षणातच कारने पेट घेतला. यावेळी महामार्गावरील वाकणं टॅबचे महामार्ग पोलिस संदिप घासे व जनार्दन मेंगाल यांनी तात्काळ जिंदाल कंपनीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे अच्युतानंद, सिक्युरिटी हेड गुलाब सिंग तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन काही क्षणातच आग आटोक्यात आणली. परंतु, सी. एन. जी. कार असल्याने तिला भीषण आग लागली आणि संपुर्ण कार जळुन खाक झाली. या घटनेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन, काही प्रमाणात सामान देखील जळुन खाक झाले. दरम्यान यावेळी वाकणं टॅबचे पो. ह. समीर पवार, काशिनाथ नागे, राजु खाडंवी, अनिल पाटील यांनी वाहतुक सुरक्षित अंतरावर थांबवून आग विझल्यावर वाहतूक पुर्ववत सुरू करण्यात आली. या अपघाताचा पुढील तपास नागोठणे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी करीत आहेत.