| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून, आता या पावसाला वादळी वाऱ्याचा जोड मिळाली आहे. या बदललेल्या हवामानाचा मोठा फटका रविवारी (दि.5) श्रीवर्धन तालुक्यातील वेळास येथील दळवीवाडीला बसला. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आलेल्या तीव्र वादळी वाऱ्याच्या झोक्यामुळे येथील स्थानिक रहिवासी साहिल दळवी यांच्या राहत्या घरावरील छपराचे सिमेंटचे पत्रे हवेत उडून गेले. अचानक आलेल्या तीव्र हवेच्या झोक्याने आणि वादळाच्या प्रचंड आवाजाने घराचे छप्पर आणि पत्रे एकाएकी उडून काही अंतरावर जाऊन पडले. पत्रे उडाल्यामुळे ऐन पावसाळ्यात घर उघडे पडले आणि घरातील संसारोपयोगी साहित्यात पाणी शिरून मोठे नुकसान झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दळवी कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक काही काळ प्रचंड भीतीखाली होते. या घटनेत घराचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कुटुंबातील सर्व सदस्य सुखरूप बचावले आहेत. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने त्यांच्या घरातील सामान सुरक्षित स्थळी हलवण्यास मदत केली. स्थानिक महसूल प्रशासन आणि तलाठ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीचा रीतसर पंचनामा करावा आणि दळवी कुटुंबाला शासनाकडून त्वरित आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी वेळास येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
वेळास येथील घराचे पत्रे उडाले
